Chennai beach selfie accident: चेन्नईच्या समुद्रकिनारी ग्रुप सेल्फी घेण्याच्या नादात आलेल्या महाकाय लाटेत महाराष्ट्रातील ३ तरुण अभियंते वाहून गेले. या घटनेत भंडारा जिल्ह्यातील मयुरी चौधरी या तरुणीचा मृत्यू झाला, जळगावचा जय पाटील हा तरुण बेपत्ता आहे.
चेन्नई : तामिळनाडूच्या किनाऱ्यावर सहलीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील तरुण अभियंत्यांवर काळाने घाला घातला आहे. चेन्नईतील समुद्रकिनारी 'ग्रुप सेल्फी' घेण्याच्या नादात उसळलेल्या महाकाय लाटेने तिघांना ओढून नेले. या दुर्दैवी घटनेत भंडारा जिल्ह्यातील मयुरी चौधरी या तरुणीचा बुडून मृत्यू झाला असून, जळगावचा जय पाटील हा तरुण अद्याप बेपत्ता आहे.
नेमकी घटना काय?
प्रसिद्ध आयटी कंपनी कॉग्नीझंट (Cognizant) मध्ये इंटर्नशिप करणारे महाराष्ट्रातील २६ तरुण-तरुणी शनिवारी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी चेन्नई-पुद्दुचेरी रोडवरील कांथाट्टूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बीचवर गेले होते. दिवसभर फिरल्यानंतर, संध्याकाळच्या सुमारास सर्व मित्र समुद्रकिनारी सेल्फी काढत असताना अचानक एक मोठी लाट आली. या लाटेच्या तडाख्यात तीन तरुण ओढले गेले.
बचावकार्य आणि सद्यस्थिती
मयुरी चौधरी (रा. वरठी, जि. भंडारा): मयुरीचा मृतदेह बचाव पथकाला सापडला आहे.
जय पाटील (रा. जळगाव): जय अद्याप बेपत्ता असून शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.
राज केदारी: सुदैवाने राजला वाचवण्यात यश आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
घटनेची माहिती मिळताच दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांनी चेन्नईकडे धाव घेतली आहे. या अपघातामुळे परिसरात आणि पीडितांच्या मूळ गावी शोककळा पसरली आहे.
महाराष्ट्र सरकारकडून तातडीची मदत
या घटनेची दखल घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तामिळनाडू प्रशासनाशी संपर्क साधला आहे. बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू ठेवण्याची विनंती त्यांनी केली आहे. तसेच, मयुरीचा पार्थिव देह महाराष्ट्रात परत आणण्यासाठी आणि बाधित कुटुंबांना आवश्यक ती सर्व मदत पुरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे अधिकारी स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात आहेत.


