जळगाव विधान परिषद बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी जिल्हा पातळीवरील स्थानिक नेतृत्वाकडे न जाता थेट मुंबईत उपमुख्यमंत्री गिरिश महाजन यांची भेट घेतली आहे, यानंतर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई : जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुतीत कुरघोडी काही थांबताना दिसत नाहीय. महायुतीच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे या अचानक काल नॉट रिचेबल झाल्या. जळगावात भाजप नेते आणि मंत्री गिरिश महाजन यांनी महायुतीचे सर्व आमदार आणि नेते यांची बैठक बोलावली. या बैठकीला पालकमंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील हे उपस्थित नव्हते. मात्र शिवसेनेचे जिल्ह्यातील इतर आमदार देखील उपस्थित होते. रेश्मा काळे या माघार शनिवारपर्यंत घेतील, अशी माहिती गिरिश महाजन यांनी प्रसार माध्यमांना दिली होती.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

रेश्मा काळे थेट मुंबईत

शिवसेनेच्या जळगाव महानगरपालिकेच्या नगरसेवक आणि विधान परिषदेच्या अपक्ष उमेदवार रेश्मा काळे यांची त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्याचं यावेळी गिरिश महाजन यांनी सांगितलं होतं. पण महायुतीच्या बंडखोर अपक्ष उमेदवार रेश्मा काळे या अचानक मुंबईत दिसून आल्या आहेत. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. रेश्मा काळे यांनी आपण माघार घेत आहोत, आजपासून प्रचार थांबवत आहोत, असा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याचं सांगण्यात येत आहे.

जळगावत चर्चा केलीच नाही

रेश्मा काळे यांनी स्थानिक पातळीवरील नेतृत्वाशी चर्चा न करता. जळगावचे पालकमंत्री आणि पक्षाचं पक्ष नेतृत्व गुलाबराव पाटील यांच्याशी तसेच भाजपाचं स्थानिक नेतृत्व करणारे गिरिश महाजन जळगावमध्ये असतानाही त्यांच्याशी चर्चा न करता त्यांनी थेट मुंबई गाठली होती.

प्रताप गुलाबराव पाटील यांना संधी देण्याची मागणी होती

जळगावमध्ये शुक्रवारी गिरिश महाजन यांनी महायुतीचे आजी माजी आमदार आणि नेत्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीला शिवसेनेचे आमदार देखील उपस्थित होते. पाचोऱ्याचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील हे देखील उपस्थित होते. गुलाबराव पाटील यांचा मुलगा प्रताप पाटील यांना जळगावात विधान परिषदेसाठी संधी द्यावी, अशी शिवसेनेची मागणी होती.

एका सभेत बोलताना आमदार किशोर पाटील यांनी प्रताप गुलाबराव पाटील यांना जाहीर सांगितलं, निवडणूक लढवायला हवी होती, वाटल्यास काही दिवस गुलाबराव पाटलांशी भांडण झाली, म्हणून अबोला ठेवायला हवा होता आणि निवडणूक अपक्ष का असेना लढवायला हवी होती, असा सल्ला आमदार किशोर पाटील यांनी दिला होता, पण माझाच फोन नंतर प्रतापने उचलला नाही अशी खंत बोलून दाखवली आणि तेच आता महायुतीच्या आमदारांच्या बैठकीला समन्वय आणि अर्ज माघारीच्या प्रयत्नासाठी उपस्थित होते.

महायुतीचे उमेदवार नंदू महाजन

महायुतीकडून भाजपाचे नंदकिशोर - नंदू महाजन हे उमेदवार आहेत, रेश्मा काळे यांच्या माघारीनंतर त्यांना मोठी साथ आपोआपच मिळणार आहे. प्रताप गुलाबराव पाटील यांना विधान परिषदेत आमदार करण्याचं स्वप्न तुर्तास तरी मागे पडलं आहे.