India vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर आमनेसामने येणार आहेत, पण यावेळी आधुनिक तारे नव्हे तर माजी दिग्गज खेळाडू भिडतील. हाँगकाँग सिक्सेस 2025 स्पर्धेत 7 नोव्हेंबरला हा बहुचर्चित सामना रंगणार आहे. 

India vs Pakistan : हाँगकाँग सिक्सेस 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान संघाचा रोमांचक सामना शुक्रवार, 7 नोव्हेंबरला दुपारी 1:05 वाजता (भारतीय वेळेनुसार) खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा तीन दिवस चालणार असून एकूण 29 सामने खेळवले जाणार आहेत. भारत आणि पाकिस्तान हे दोघेही ग्रुप C मध्ये आहेत, तर त्यांच्यासोबत कुवेत हा देखील संघ आहे. टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू आर. अश्विन दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे, त्यामुळे भारतीय संघाला थोडा धक्का बसला आहे.

12 संघ, चार गट

हाँगकाँग सिक्सेसमध्ये यंदा 12 संघ सहभागी झाले आहेत. त्यांना प्रत्येकी तीन-तीन संघांच्या चार गटांमध्ये विभागले गेले आहे. या स्पर्धेची सुरुवात 1990 साली झाली होती आणि ती आपल्या अनोख्या फॉर्मेटसाठी प्रसिद्ध आहे. सर्व सामने टिन क्लेंग रोड रिक्रिएशन ग्राउंड येथे खेळले जाणार आहेत. प्रत्येक सामना फक्त 6 षटकांचा असल्याने हा क्रिकेट महोत्सव जलद, मनोरंजक आणि रोमांचक ठरणार आहे.

स्पर्धेतील गट (Pools):

  • पूल A: दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, नेपाळ
  • पूल B: ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, यूएई
  • पूल C: भारत, पाकिस्तान, कुवेत
  • पूल D: श्रीलंका, बांग्लादेश, हॉंगकॉंग

भारतीय संघाचे नेतृत्व

भारतीय संघाचे नेतृत्व माजी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक करणार आहे. त्याच्यासोबत अनुभवी खेळाडू स्टुअर्ट बिन्नी, रॉबिन उथप्पा, शाहबाज नदीम, प्रियांक पांचाल आणि भरत चिपली हे संघात आहेत. हा संघ अनुभव आणि दमदार फलंदाजीसाठी ओळखला जातो.

सामने कुठे आणि कसे पाहाल?

भारतीय प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा Sony Sports Network वर थेट पाहता येईल. तसेच, ऑनलाइन स्ट्रिमिंगसाठी SonyLIV आणि FanCode अ‍ॅप उपलब्ध असतील. याशिवाय Cricket Hong Kong च्या अधिकृत YouTube चॅनलवरही सर्व सामने लाईव्ह पाहता येतील.

स्पर्धेचा अनोखा फॉर्मेट आणि नियम

हाँगकाँग सिक्सेसचे आकर्षण म्हणजे त्याचा जलद आणि वेगळा फॉर्मेट —

  • प्रत्येक संघात फक्त 6 खेळाडू असतात.
  • प्रत्येक डावात 6 षटके दिली जातात (एकूण 12 षटकांचा सामना).
  • 5 खेळाडू गोलंदाजी करू शकतात, पण यष्टिरक्षकाला परवानगी नसते.
  • एक फलंदाज 50 धावा पूर्ण केल्यानंतर ‘नॉट आऊट’ अवस्थेत रिटायर व्हावा लागतो; इतर बाद झाल्यावर तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो.

शेवटचा फलंदाज नियम

जर संघाचे 5 फलंदाज बाद झाले, तर शेवटचा फलंदाज एकट्याने फलंदाजी करू शकतो. त्याच्यासोबत शेवटचा बाद झालेला खेळाडू फक्त रनर म्हणून राहतो. मात्र, जर रनर बाद झाला, तर डाव समाप्त मानला जातो. हा नियम सामन्यांना अधिक रोमांचक बनवतो.