Aviation News: केंद्र सरकारने हवाई वाहतूक क्षेत्रात अलहिंद एअर आणि 'फ्लाय एक्सप्रेस' या दोन नवीन एअरलाइन्सना NOC मंजूर केली आहे. भारतीय हवाई बाजारपेठेत या नवीन कंपन्यांच्या प्रवेशामुळे स्पर्धा वाढून विमान प्रवासाचे दर कमी होण्याची शक्यता आहे.
Aviation News: एकेकाळी विमान प्रवास हा मध्यमवर्गाचे एक स्वप्न होते. त्यावेळी अवाच्या सवा असणाऱ्या विमान भाड्यामुळे हा प्रवास आवाक्याबाहेर वाटायचा. मात्र मध्यमवर्गाची वाढती लोकसंख्या आणि त्यांची वाढती क्रयशक्ती यामुळे हवाई प्रवासाची मागणी वाढली. इंडिगोसारख्या कंपन्यांनी कमी किमतीत तिकीट देण्यास सुरुवात केली आहे आणि नवीन विमानतळांवर सेवा देण्यासाठी सरकारने विमानतळ शुल्क व करांमध्ये कपात केली आहे, ज्यामुळे प्रादेशिक विमानसेवा स्वस्त झाली आहे. UDAN' सारख्या योजनेमुळे छोट्या शहरांतील विमानसेवा सुरू करण्यास प्रोत्साहन मिळाले, ज्यामुळे प्रवास अधिक परवडणारा झाला आहे.
मात्र संपूर्ण हवाई वाहतूक क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या इंडिगो संकटानंतर, केंद्र सरकारने देशात दोन नवीन एअरलाइन्सना एनओसी (NOC) मंजूर केली आहे. अलहिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेस या कंपन्यांना सरकारने एनओसी दिली आहे. हवाई वाहतूक क्षेत्रातील मक्तेदारी संपवणे हा यामागील उद्देश असल्याचे मानले जात आहे.
केरळमधील अलहिंद ग्रुपचा 'अलहिंद एअर' हा एक उपक्रम आहे. नवीन कंपन्यांच्या आगमनामुळे प्रवाशांना अधिक पर्याय मिळतील आणि विमान प्रवासाचे दर कमी होण्याची शक्यता आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या हवाई बाजारपेठ असलेल्या भारतात स्पर्धेचा अभाव दूर करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
भारतीय हवाई बाजारपेठेत सुमारे 65% वाटा इंडिगोचा आहे. त्यानंतर एअर इंडिया ग्रुपचा वाटा सुमारे 27% आहे. उर्वरित वाटा लहान विमान कंपन्यांचा आहे. म्हणजेच, भारतीय आकाशात इंडिगो आणि एअर इंडियाचे वर्चस्व सुमारे 92% आहे. त्यामुळे नवीन कंपन्यांच्या प्रवेशामुळे या क्षेत्रात अधिक स्पर्धा निर्माण होण्यास मदत होईल.
अलहिंद ग्रुप ही ट्रॅव्हल अँड टूर मॅनेजमेंट क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी आहे. हवाई वाहतूक क्षेत्रातील हे अलहिंदचे पहिले पाऊल आहे. कंपनी प्रादेशिक सेवा म्हणून आपले कार्य सुरू करेल. कार्यक्षम आणि विश्वासार्ह देशांतर्गत प्रवास सुनिश्चित करणे हे अलहिंद एअरचे उद्दिष्ट आहे. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अलहिंदच्या कामकाजाचे केंद्र असेल. सुरुवातीला कोची, तिरुवनंतपुरम, कोझिकोड आणि कन्नूर या शहरांना जोडणारी प्रादेशिक सेवा आणि बंगळूर, हैदराबाद, चेन्नई यांसारख्या शहरांसाठी सेवा सुरू केली जाईल.
एटीआर (ATR) टर्बोप्रॉप विमानांचा वापर करून दक्षिण भारतात सेवा सुरू करण्याचे अलहिंदचे उद्दिष्ट आहे. सध्या एअर ऑपरेटर सर्टिफिकेट मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. फ्लाय एक्सप्रेस देखील आपले कामकाज सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फ्लाय एक्सप्रेस ही तेलंगणास्थित कंपनी आहे. लॉजिस्टिक, कुरिअर आणि कार्गो क्षेत्रांत अनुभव असलेले प्रवर्तक या कंपनीमागे आहेत. उत्तर प्रदेशातील शांक एअरला यापूर्वीच परवानगी मिळाली होती. शांक एअर एक फुल-सर्व्हिस एअरलाइन म्हणून काम करेल. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे त्यांच्या कामकाजाचे मुख्य केंद्र असेल.
पासून आतापर्यंत, प्रादेशिक विमान कंपन्यांसह सहा ऑपरेटर्सना देशात सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो, अलायन्स एअर व्यतिरिक्त आकासा एअर, स्पाईसजेट, स्टार एअर, फ्लाय ९१ आणि इंडिया वन एअर या विमान कंपन्या सध्या कार्यरत आहेत.


