बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान एका नव्या लुकमध्ये दिसला आणि सोशल मीडियावर धुमाकूळ उडाला. आमिर खानच्या 'लगान' सिनेमाच्या २५ व्या वाढदिवसाच्या पार्टीत तो बज कट हेअरस्टाईलमध्ये पोहोचला. त्याचा हा लुक पाहून चाहते हैराण झाले आहेत. काहींच्या मते हा त्याच्या 'मातृभूमी' या आगामी सिनेमासाठीचा लुक असू शकतो. जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण.
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी कारण त्याचा सिनेमा नाही, तर त्याचा नवीन लुक आहे. आमिर खान प्रॉडक्शन्स आणि 'लगान' सिनेमाच्या २५ व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत सलमान खान पोहोचला आणि त्याच्या नव्या हेअरस्टाईलने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. बज कट लुकमधील सलमानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमात आमिर खान आणि करीना कपूर खान यांच्यासोबत त्याची उपस्थितीही चर्चेचा विषय ठरली. सलमानचा हा नवा अवतार त्याच्या आगामी सिनेमासाठी आहे की फक्त एक स्टाईल ट्रान्सफॉर्मेशन, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण लोक या लुकवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

सलमान खानच्या नव्या लुकवर अशा आल्या कमेंट्स
आमिर खानच्या पार्टीत सलमान खानचा लुक पाहून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. कोणी त्याला 'व्हिलन' म्हणत आहे, तर कोणी त्याच्या वाढत्या वयावर कमेंट करत आहे. उदाहरणार्थ, एका इंटरनेट युझरने लिहिलं आहे, "सॉरी भाईजान, पण आता म्हातारपण लपत नाहीये." दुसऱ्या एका युझरने कमेंट केली, "व्हिलन वाटतोय." एकाने लिहिलं, "आशा आहे की तो ठीक असेल." तर एका युझरने म्हटलं, "मला सलमान खान आवडतो, पण या लुकमध्ये तो असा विचित्र का दिसतोय?" एका युझरने लिहिलं, “गजनी तर आमिर खान होता, मग हा सलमान खान का बनलाय?”
आमिर आणि करीनासोबत फोटोशूट
या कार्यक्रमात सलमान खान पोहोचला, त्याचवेळी करीना कपूर खानही आली. त्यानंतर आमिर खान, सलमान खान आणि करीना कपूर खान यांनी मीडियासाठी एकत्र फोटो काढले. या तिन्ही स्टार्सची ही भेट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
'मातृभूमी'साठी बदललाय लुक?
सध्या सलमान खानच्या या नव्या लुकबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, चाहत्यांच्या मते हा बदल त्याच्या आगामी 'मातृभूमी' या सिनेमाशी संबंधित असू शकतो. पण अद्याप निर्माते किंवा स्वतः सलमानकडून यावर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' या सिनेमात सलमान खानसोबत चित्रांगदा सिंह महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा २०२० मध्ये भारत आणि चीन यांच्यात गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. अपूर्व लाखिया दिग्दर्शित या सिनेमाचं नाव आधी 'बॅटल ऑफ गलवान' असं होतं, पण भारत सरकारच्या हस्तक्षेपानंतर ते बदलण्यात आलं.
'मातृभूमी' व्यतिरिक्त सलमान खान दिग्दर्शक वामशी पैदिपल्ली यांच्या एका पॅन इंडिया सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमाचं तात्पुरतं नाव SVC63 असं ठेवण्यात आलं आहे. दिल राजू या सिनेमाचे निर्माते असून सलमान खानसोबत यामध्ये नयनतारा दिसणार आहे. हा सिनेमा २०२७ मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होईल.


