गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या नात्यातील तणावाच्या चर्चांदरम्यान सुनीता फॅमिली कोर्टात पोहोचल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले. पण गोविंदाच्या मॅनेजरने एका गोष्टीबाबत खुलासा केला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा गेल्या काही काळापासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. दोघांमधील मतभेदांच्या बातम्यांनंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले होते. सुनीता यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. त्यानंतर सुनीता यांना फॅमिली कोर्टाबाहेर पाहण्यात आल्यानंतर या चर्चांना आणखी हवा मिळाली. मात्र, आता त्या फॅमिली कोर्टात नेमक्या कोणत्या कारणासाठी गेल्या होत्या, याची माहिती समोर आली आहे.
घटस्फोटाचा अर्ज मागे घेण्यासाठी फॅमिली कोर्टात?
मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता आहुजा घटस्फोटाचा दाखल केलेला अर्ज मागे घेण्यासाठी फॅमिली कोर्टात गेल्या होत्या, अशी माहिती समोर आली होती. त्यामुळे गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता वेगळे वळण मिळाले होते. पण या प्रकरणाबाबत दोघांकडून अधिकृतपणे सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.
गोविंदाच्या मॅनेजरने काय सांगितले?
दरम्यान, गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनीही सुनीता फॅमिली कोर्टात गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, कौटुंबिक विषय सार्वजनिक चर्चेचा भाग होणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. कौटुंबिक वाद हे कुटुंबाच्या पातळीवरच सोडवले पाहिजेत. एकत्र बसून चर्चा केल्याने अनेक गोष्टी ठीक होऊ शकतात, असे शशी सिन्हा यांनी सांगितले.
‘सगळं अचानक झालं’
शशी सिन्हा यांनी या संपूर्ण प्रकरणावर नाराजी व्यक्त केली. जर अखेरीस प्रकरण मागे घ्यायचे होते, तर ते दाखल करण्याची गरज का पडली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.हे सर्व अचानक घडले असून गोविंदाकडून सध्या कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही, असेही त्यांनी सांगितले. गोविंदा, सुनीता आणि त्यांच्या मुलांसाठी आपण नेहमीच चांगलेच बोललो असल्याचे त्यांनी म्हटले.
गोविंदा-सुनीताच्या नात्याबाबत चर्चांना उधाण
गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत गेल्या काही काळापासून विविध चर्चा सुरू आहेत. फॅमिली कोर्टातील सुनीता यांच्या उपस्थितीनंतर या चर्चांना आणखी जोर आला. पण घटस्फोटाचा अर्ज मागे घेण्यासाठी त्या न्यायालयात गेल्याची माहिती समोर आल्याने आता या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


