UP Crime : उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एक हादरवणारी घटना समोर आली आहे. इथे एका ७२ वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याने आपल्या ३५ वर्षीय मुलीच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह तब्बल ४ महिने घरातल्या एका बंद खोलीत लपवून ठेवला. घरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे हे प्रकरण उघडकीस आलं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

UP Crime : उत्तर प्रदेशच्या मेरठमधील सदर बाजार परिसरातल्या तेली मोहल्ल्यात एक अशी घटना घडली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ७२ वर्षांच्या उदयभानू बिस्वास नावाच्या व्यक्तीने आपल्या ३५ वर्षीय मुलगी प्रियंका बिस्वासच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह तब्बल चार महिने घरातच लपवून ठेवला होता. प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंकाचा मृत्यू १ डिसेंबर २०२५ रोजी आजारपणामुळे झाला होता. पण त्यानंतर जे घडलं, त्यामुळे हे प्रकरण आणखी गूढ आणि गंभीर बनलं आहे.

मुलीच्या मृत्यूनंतरही विचित्र वागणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या मृत्यूनंतरही वडिलांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले नाहीत. उलट, त्यांनी तिचा मृतदेह घरातल्याच एका बंद खोलीत ठेवला. काही दिवसांनी शेजाऱ्यांना घरातून प्रचंड दुर्गंधी येऊ लागली, पण प्रकरण इतकं गंभीर असेल याचा त्यांना अंदाज आला नाही. असं सांगितलं जातंय की, वास लपवण्यासाठी आरोपी वडील परफ्यूम आणि इतर गोष्टींचा वापर करत होते.

चार महिन्यांनी गुपित उघड झालं

एप्रिल २०२६ मध्ये हा सगळा प्रकार समोर आला. घरातून सतत दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी पोलिसांकडे केली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना घरातल्या एका खोलीत मृतदेह सापडला. तोपर्यंत मृतदेह पूर्णपणे सडून त्याचा सांगाडा झाला होता. हे दृश्य पाहून तपास करणारे अधिकारीही चक्रावून गेले. १० एप्रिल रोजी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

मानसिक स्थितीवरही प्रश्नचिन्ह

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी उदयभानू बिस्वास हे मूळचे पश्चिम बंगालचे आहेत आणि ते शिक्षण विभागातून प्रशासकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता, त्यांची मानसिक तपासणीही करण्यात आली आहे. यामागे त्यांचं मानसिक असंतुलन आहे की दुसरं काही कारण आहे, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत.

पोलीस तपास आणि पुढील कारवाई

मेरठ पोलिसांनी बुधवारी आरोपी उदयभानू यांना अटक केली आहे. मृत्यूचं खरं कारण काय, मृतदेह का लपवून ठेवला आणि कुटुंबाची नेमकी परिस्थिती काय होती, अशा सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सध्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं आणि चर्चेचं वातावरण आहे. ही केवळ एक गुन्हेगारी घटना नाही, तर त्यामागे अनेक मानसिक आणि सामाजिक प्रश्न दडले आहेत, ज्यांची उत्तरं पोलीस तपासानंतरच समोर येतील.