Vegetarian City: जगातलं पहिलं शहर जिथे अंडं विकल्यावरही होते कारावासाची शिक्षा
Vegetarian City: गुजरातच्या पालीताना शहराने जगातलं पहिलं 'शाकाहारी शहर' होण्याचा मान मिळवला आहे. या शहरात मांसाहार तर सोडाच, पण साधं अंडं विकण्यावरही कायद्याने बंदी आहे आणि तसं केल्यास तुरुंगवास होऊ शकतो. जाणून घेऊया या शहराची खास गोष्ट.

अंडं विकलं तरी थेट तुरुंगवास!

जगातलं पहिलं 'नॉन-व्हेज फ्री' शहर
गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात पालीताना नावाचं एक छोटंसं शहर आहे. हे शहर अहमदाबादपासून साधारण 214 किलोमीटर अंतरावर आहे. शत्रुंजय पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं हे शहर जैन धर्मीयांचं एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या पर्वतांवर 900 पेक्षा जास्त जैन मंदिरं आहेत. 2014 साली पालीतानाने एक नवा इतिहास घडवला. मांस, मासे आणि अंडी यांच्या विक्रीवर आणि वापरावर पूर्णपणे बंदी घालणारं हे जगातलं पहिलं शहर ठरलं.
200 जैन साधूंचा लढा
या बंदीमागे एक मोठी कहाणी आहे. 2014 मध्ये, पालीताना शहरातील सुमारे 200 जैन साधूंनी एक मोठं आंदोलन सुरू केलं. शहरात आणि आसपास सुरू असलेली जवळपास 250 खाटकांची दुकानं सरकारने तात्काळ बंद करावीत, अशी त्यांची मागणी होती. या आंदोलनाने देशभरातील लोकांचं लक्ष वेधून घेतलं, ज्यामुळे स्थानिक प्रशासन आणि सरकारवर प्रचंड दबाव वाढला.
सरकारचा ऐतिहासिक निर्णय
जैन साधूंच्या मोठ्या आंदोलनानंतर गुजरात सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला. पालीताना शहराच्या हद्दीत प्राणीहत्या, मांस आणि अंडी विक्रीवर पूर्णपणे बंदी घालणारा कायदा सरकारने मंजूर केला. या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईची तरतूद आहे. त्यामुळे या शहरात अंडं विकणं हा केवळ गुन्हा नाही, तर तुरुंगवास होण्याइतका मोठा अपराध आहे. जैन धर्मात 'अहिंसे'ला सर्वोच्च स्थान आहे आणि त्यांच्या 2500 वर्षांच्या जुन्या सिद्धांताला या कायद्यामुळे अधिकृत मान्यता मिळाली.

