India Boosts Naval Presence in Gulf Region Amid Rising Tensions : आखाती प्रदेशात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय मालवाहू जहाजांच्या सुरक्षेसाठी नौदलाने 'ऑपरेशन संकल्प' मोहिमेअंतर्गत अतिरिक्त युद्धनौका तैनात केल्या आहेत. 

India Boosts Naval Presence in Gulf Region Amid Rising Tensions : आखाती प्रदेशात तणाव चांगलाच वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय मालवाहू जहाजांच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदलाने आपल्या युद्धनौकांची संख्या वाढवली आहे. 'ऑपरेशन संकल्प' या मोहिमेअंतर्गत सध्या सहापेक्षा जास्त युद्धनौका तैनात करण्यात आल्या आहेत. या युद्धनौका होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या भारतीय ध्वज असलेल्या एलपीजी (LPG) आणि कच्च्या तेलाच्या (Crude Oil) जहाजांना सुरक्षा कवच पुरवत आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

इस्रायली हल्ल्यात इराणचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी अली लारीजानी यांच्या मृत्यूबद्दल भारताने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधी भारताने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला होता, पण लारीजानींच्या हत्येवर केंद्र सरकारने मौन बाळगलं आहे. या प्रदेशात आणखी तणाव न वाढवता दोन्ही बाजूंनी संयम ठेवावा आणि राजनैतिक चर्चेतून तोडगा काढावा, अशी भारताची सर्वसाधारण भूमिका आहे.

इराण आणि इस्रायलमधील संघर्ष चिघळल्यास आखाती प्रदेशातील मालवाहतुकीत अडथळे येऊ शकतात. याचा थेट परिणाम भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर होईल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या पर्शियन आखातात अडकलेल्या भारतीय जहाजांवरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी जहाज वाहतूक मंत्रालय आणि नौदल २४ तास कार्यरत असलेल्या कंट्रोल रूममधून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

इराणविरोधात १२ अरब देशांची एकजूट

पश्चिम आशियातील इराणच्या लष्करी कारवायांविरोधात आखाती देशांमध्ये नाराजी वाढत आहे. प्रदेशातील शांतता भंग करणाऱ्या सशस्त्र गटांना शस्त्रं आणि पैसा पुरवणं इराणने तात्काळ थांबवावं, अशी मागणी १२ आखाती-अरब-इस्लामिक देशांनी एका संयुक्त निवेदनात केली आहे. तेल शुद्धीकरण प्रकल्प (Refineries) आणि तेल क्षेत्रांवर हल्ला झाल्यास त्याचा जागतिक इंधन बाजारावर परिणाम होईल आणि याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा सौदी अरेबियाने दिला आहे. कतारमधील रास लफान इंडस्ट्रियल सिटीवर झालेल्या हल्ल्यात मोठं नुकसान झाल्याची माहिती कतार एनर्जीने दिली आहे. यात एका एलपीजी प्लांटचं मोठं नुकसान झालं आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीला असलेला धोका संपवावा आणि बाब अल-मंदाब सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रयत्न करू नये, अशी मागणीही अरब देशांनी केली आहे. दरम्यान, तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्की हे देश इराणसोबत थेट चर्चा करत आहेत.