बदलती जीवनशैली, तणाव, अवेळी जेवणाच्या सवयी आणि पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे जास्त केसगळती होऊ शकते, असे पोषणतज्ज्ञ नमामी अग्रवाल म्हणतात. केस गळती होऊ नये म्हणून काय उपाय करायला हवेत. कोणती पोषणमूल्य आपल्या आहारात हवीत? जाणून घ्या या लेखातून…
काळे, सुंदर आणि चमकदार केस गळू लागले की आपली चिंता वाढते. आजकाल बहुतेक लोकांमध्ये केसगळची समस्या मोठ्या प्रमाणात आढळते. सध्याच्या धावपळीच्या जीवनात बदलती जीवनशैली, ताण-तणाव आणि अनारोग्यकारक खाण्याच्या सवयी ही केसगळतीची प्रमुख कारणे आहेत. बरेच लोक शॅम्पू आणि सीरम वापरतात, पण त्यामुळे केसगळती तात्पुरती थांबते. पोषणतज्ज्ञ नमामी अग्रवाल यांच्या मते, काही पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे जास्त केसगळती होऊ शकते. ती कायमस्वरुपी थांबवण्यासाठी कोणती पोषक तत्वे आहारात हवीत, ते आता पाहूया.
एक
कमकुवत आणि तुटणाऱ्या केसांचे पहिले कारण म्हणजे शरिरात झिंकची कमतरता होय. केराटिन नावाच्या प्रथिनासाठी पुरेशा प्रमाणात झिंक आवश्यक असते. केस तुटणे कमी करण्यासाठी झिंकयुक्त पदार्थांचे सेवन करा. आहारात अंडी, जवस, भोपळ्याच्या बिया यांसारख्या झिंकयुक्त पदार्थांचा समावेश करा.
दोन
व्हिटॅमिन डीची कमतरता हे देखील केसगळतीचे एक प्रमुख कारण ठरू शकते. व्हिटॅमिन डी अँटीमायक्रोबियल पेप्टाइड्सच्या निर्मितीला प्रोत्साहन देते. हे टाळूला सूज आणि संसर्गापासून वाचवण्यास मदत करते. व्हिटॅमिन डीची पातळी कमी झाल्यामुळे खाज, कोंडा आणि जास्त केसगळती होऊ शकते. मासे (सॅल्मन, बांगडा, ट्राउट, सार्डिन), मशरूम, अंड्यातील पिवळा बलक, दूध, तृणधान्ये आणि संत्री यांसारख्या पौष्टिक पदार्थांमध्ये व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात आढळते.
तीन
महिलांमध्ये आढळणारी लोहाची (Iron) कमतरता केसांच्या वाढीस थेट अडथळा आणू शकते. शरीरात ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी लोह आवश्यक आहे. लोहाच्या कमतरतेमुळे ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, ज्यामुळे कालांतराने केसगळती होते. पालक, मसूर, बीन्स, नट्स, बिया, सुका मेवा आणि पालेभाज्यांमध्ये लोह भरपूर प्रमाणात असते.


