इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन निलेकणी यांच्या मते, फ्रंट-एंड डेव्हलपर्स, QA टेस्टर्स आणि आयटी सपोर्ट स्पेशालिस्ट्स यांसारख्या पारंपरिक आयटी नोकऱ्या धोक्यात आहेत.

बंगळुरू: इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन निलेकणी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) बद्दल एक मोठं विधान केलं आहे. त्यांच्या मते, AI मुळे जागतिक अर्थव्यवस्था आणि नोकरीच्या बाजारपेठेत आतापर्यंतच्या कोणत्याही तंत्रज्ञानापेक्षा मोठे बदल होणार आहेत. बंगळुरूमध्ये झालेल्या '2026 इन्फोसिस एआय इन्व्हेस्टर डे' मध्ये ते बोलत होते.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

AI मुळे काही नोकऱ्यांवर येणार गदा

निलेकणी यांनी थेट इशारा दिला आहे की, सध्या भारतात मोठ्या प्रमाणात असलेल्या अनेक आयटी नोकऱ्यांवर एआयमुळे गदा येऊ शकते. फ्रंट-एंड डेव्हलपर्स, QA टेस्टर्स, आयटी सपोर्ट स्पेशालिस्ट्स आणि ब्लॉकचेन डेव्हलपर्स यांसारख्या विशिष्ट कामांसाठी प्रशिक्षण घेतलेल्या इंजिनिअर्सची गरज कमी होईल, असं त्यांचं मत आहे. जवळपास ९० दशलक्ष नोकऱ्या धोक्यात असल्याचं निलेकणी यांनी स्पष्ट केलं.

पण एक चांगली बातमीही आहे. निलेकणींच्या मते, ज्या नोकऱ्या जातील, त्यांच्या जागी तब्बल १७० दशलक्ष नव्या AI-केंद्रित नोकऱ्या तयार होतील. डेटा एनोटेटर्स, एआय इंजिनिअर्स, एआय फॉरेन्सिक विश्लेषक, फॉरवर्ड-डिप्लॉइड इंजिनिअर्स आणि एजंट वर्कफ्लो आर्किटेक्ट्स यांसारख्या नवीन पदांना भविष्यात मोठी मागणी असेल, असंही त्यांनी सांगितलं.

याला दुजोरा देणारी आकडेवारीही समोर आली आहे. लिंक्डइनच्या रिपोर्टनुसार, भारतात 'प्रॉम्प्ट इंजिनिअर' ही सर्वात वेगाने वाढणारी नोकरी ठरली आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर 'एआय इंजिनिअर' आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या 'एआय इंडेक्स रिपोर्ट 2025' नुसार, 2024 मध्ये भारतात एआय नोकरभरतीत ३३.४ टक्के वाढ झाली, जी ब्राझील आणि सौदी अरेबियापेक्षाही जास्त आहे.

सिस्टीम अपग्रेड करणं महत्त्वाचं

निलेकणी म्हणाले की, कंपन्या त्यांच्या जुन्या सिस्टीमला AI-रेडी करण्यासाठी बजेटच्या ६० ते ७० टक्के खर्च करत आहेत. त्यामुळे आता फक्त कोड लिहिणं महत्त्वाचं नाही, तर सिस्टीम अपग्रेड करणं जास्त गरजेचं आहे. विद्यार्थी आणि तरुण प्रोफेशनल्सनी टेक्निकल ज्ञानासोबतच संवाद कौशल्यासारखे मानवी गुणही (human skills) विकसित करावेत, असा सल्ला त्यांनी दिला. निलेकणींच्या या दाव्यांमुळे मोठी चर्चा सुरू झाली असून, भविष्यात यशस्वी होण्यासाठी AI ज्ञान आणि संवाद कौशल्य या दोन्हींची गरज असेल, असं तज्ज्ञांचं मत आहे.