- Home
- Utility News
- मुंबईकरांना दिलासा! आता मध्य रेल्वेची लोकल 'ऑन टाईम' धावणार; रेल्वे प्रशासनाचा 'हा' मोठा मास्टरप्लॅन
मुंबईकरांना दिलासा! आता मध्य रेल्वेची लोकल 'ऑन टाईम' धावणार; रेल्वे प्रशासनाचा 'हा' मोठा मास्टरप्लॅन
Mumbai Central Railway Local Train Status: मध्य रेल्वेने मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी नवीन योजना आखली आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळी लांब पल्ल्याच्या गाड्यांना उपनगरीय हद्दीबाहेर थांबवून लोकल गाड्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

मुंबईकरांना दिलासा! आता मध्य रेल्वेची लोकल 'ऑन टाईम' धावणार
मुंबई : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विस्कळीत झालेल्या लोकल सेवेमुळे त्रस्त असलेल्या चाकरमान्यांना दिलासा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे. सकाळी कामावर जाण्याच्या धावपळीत (Morning Peak Hours) होणारा लोकलचा विलंब टाळण्यासाठी आता एक नवीन 'ऑपरेशन' राबवण्यात येणार आहे.
नेमकं काय आहे रेल्वेचं नवं नियोजन?
सकाळच्या वेळी उत्तर भारतातून मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या (Express) गाड्यांमुळे लोकल सेवेचा बोजवारा उडत होता. आता रेल्वेने असा निर्णय घेतला आहे की, सकाळच्या गर्दीच्या वेळी मेल-एक्सप्रेस गाड्यांना मुंबईच्या उपनगरीय हद्दीत प्रवेश दिला जाणार नाही. जोपर्यंत लोकल गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत होत नाही, तोपर्यंत या एक्स्प्रेस गाड्यांना कसारा, आसनगाव आणि टिटवाळा यांसारख्या स्थानकांवरच रोखून धरले जाईल.
लोकल उशिरा धावण्यामागचे मुख्य कारण काय?
उत्तर भारतात सध्या असलेल्या दाट धुक्यामुळे तिकडून येणाऱ्या गाड्या ४ ते ५ तास उशिराने धावत आहेत. नियमानुसार या गाड्या पहाटे ५ वाजेपर्यंत मुंबईत पोहोचणे आवश्यक असते. मात्र, धुक्यामुळे या गाड्या थेट सकाळी ८ ते १० च्या दरम्यान (गर्दीच्या वेळी) मुंबईच्या वेशीवर पोहोचतात. या एक्सप्रेस गाड्यांना रस्ता मोकळा करून देताना कर्जत, कसारा आणि बदलापूरहून येणाऱ्या लोकल गाड्यांना ३० ते ४० मिनिटांचा फटका बसत होता.
प्रवाशांच्या संतापानंतर रेल्वेचा ॲक्शन मोड
एसी लोकलचे आगमन आणि एक्स्प्रेसचा हस्तक्षेप यामुळे सामान्य मुंबईकर प्रचंड वैतागला होता. प्रवाशांच्या वाढत्या रोषानंतर रेल्वे प्रशासनाने हा 'प्रायोगिक' बदल केला आहे.
प्राधान्य लोकलला: आता सकाळी ८ ते ११ या वेळेत फक्त लोकल गाड्यांना 'ग्रीन सिग्नल' असेल.
प्रवाशांची मागणी मान्य: एक्सप्रेसच्या क्रॉसिंगमुळे होणारा खोळंबा आता कमी होणार आहे.
शिस्तबद्ध वेळापत्रक: यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (CSMT) जाणाऱ्या गाड्या वेळेवर पोहोचण्यास मदत होईल.
रेल्वेच्या या नव्या प्रयोगामुळे उद्यापासून मुंबईकरांचा सकाळचा प्रवास अधिक सुसह्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

