या वर्षापासून V2V टेक्नॉलॉजी लागू, गडकरींची घोषणा; काय आहे हे नवे तंत्रज्ञान?
या वर्षापासून व्हेईकल-टू-व्हेईकल टेक्नॉलॉजी लागू होणार असल्याचे गडकरी म्हणाले. 2026 च्या अखेरपर्यंत नवीन तंत्रज्ञान लागू होत आहे. हे वाहनांसाठी अनिवार्य असेल. याबाबत केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली आहे.

व्हेईकल-टू-व्हेईकल टेक्नॉलॉजी
भारतात वाहन आणि रस्ते वाहतुकीमध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वाहनचालकांचा वेळ वाचवण्यासाठी आणि प्रवास सुखकर करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. फास्टॅग तंत्रज्ञान जीपीएस आधारित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर, या वर्षाच्या अखेरीस व्हेईकल-टू-व्हेईकल तंत्रज्ञान लागू होत आहे.
काय आहे व्हेईकल-टू-व्हेईकल टेक्नॉलॉजी?
केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या नवीन तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीबद्दल माहिती दिली. देशातील वाढते अपघात कमी करण्यासाठी आणि रस्ते सुरक्षेसाठी हे नवीन तंत्रज्ञान आणले आहे. या तंत्रज्ञानामुळे रस्ते अपघात रोखता येतील, असे ते म्हणाले. रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांना इतर वाहनांची धडक बसण्याचे प्रमाण हे तंत्रज्ञान कमी करेल. दाट धुक्यामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही यामुळे कमी होईल. प्रामुख्याने रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने हे नवीन तंत्रज्ञान याच वर्षी लागू होत आहे.
हे तंत्रज्ञान कसे काम करते?
व्हेईकल-टू-व्हेईकल तंत्रज्ञानामध्ये एक चिप वाहनात बसवली जाईल. ही चिप कोणत्याही नेटवर्कशिवाय एका वाहनातून दुसऱ्या वाहनाशी संवाद साधेल आणि संदेश पाठवेल. या तंत्रज्ञानामुळे, कोणतेही वाहन जवळ येताच किंवा पार्क केलेल्या वाहनांच्या जवळ येताच अलर्ट मिळेल. पार्क केलेली वाहने देखील अलर्ट संदेश देतील. यामुळे चालकांना पार्क केलेल्या वाहनांबद्दल आणि दाट धुक्यात इतर वाहने दिसत नसतानाही अलर्ट मिळेल, असे नितीन गडकरी म्हणाले.
सिमसारखी चिप, 360-डिग्री कम्युनिकेशन
मोबाईल सिमसारखी एक चिप बसवली जाईल. ही चिप रिअल-टाइम अलर्ट देईल, ज्यामुळे वाहनचालकांना मदत होईल. विशेष म्हणजे, रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनाचे अचूक लोकेशन कळेल. कोणतेही वाहन जवळ आल्यास अलर्ट मिळेल. यामुळे चालकांना सावधपणे गाडी चालवण्यास आणि अपघात टाळण्यास मदत होईल. वाहनाच्या कोणत्याही बाजूने दुसरे वाहन आले तरी अलर्ट मिळेल. हे 360-डिग्री कम्युनिकेशन करेल.
सर्व वाहनांमध्ये बसवले जाईल का?
2026 च्या अखेरीस हे नवीन तंत्रज्ञान लागू होईल. सुरुवातीच्या टप्प्यात ते नवीन वाहनांमध्ये बसवले जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर वाहनांमध्येही बसवले जाईल. हा तब्बल 5000 कोटी रुपयांचा प्रकल्प प्रगतीपथावर आहे. या सिम चिपसाठी ग्राहकांना किती पैसे द्यावे लागतील, याची माहिती अद्याप उपलब्ध नाही.
सर्व वाहनांमध्ये बसवले जाईल का?
ADAS टेकसोबत समन्वय
नवीन कारमधील ADAS (ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम) तंत्रज्ञानासोबत ही सिम चिप समन्वय साधेल. यामुळे रस्ते सुरक्षेला प्राधान्य मिळेल. V2V तंत्रज्ञानामुळे भारतातील रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमांच्या पालनात सुधारणा होईल, असे नितीन गडकरी म्हणाले.

