भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना म्हणजे नेहमीच हाय व्होल्टेज ड्रामा असतो. पण शनिवारी झालेल्या महिला आशिया कप २०२६ च्या मॅचमध्ये एक असं दृश्य पाहायला मिळालं, जे फक्त खेळापुरतं मर्यादित नव्हतं, तर ते सीमेपलीकडचं प्रेम आणि आदर दाखवणारं होतं.
दुबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना म्हणजे मैदानात आणि मैदानाबाहेरही तणावाचं वातावरण असतं. पण शनिवारी झालेल्या महिला आशिया कप २०२६ च्या मॅचमध्ये एक असं दृश्य पाहायला मिळालं, ज्याने सर्वांची मनं जिंकली आहेत.
मॅच सुरू होण्यापूर्वी दोन्ही देशांची राष्ट्रगीतं वाजवण्यात आली. यावेळी पाकिस्तानची जर्सी घातलेला अर्शद मोहम्मद हनीफ नावाचा एक चाहता, भारताचं राष्ट्रगीत 'जन गण मन' मोठ्या आदराने आणि उत्साहाने गाताना दिसला.
स्टँडमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय चाहत्यांसोबत तो राष्ट्रगीत गात असल्याचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अर्शद हनीफ हा पाकिस्तानचा एक प्रसिद्ध क्रिकेट चाहता असून, याआधीही त्याने अनेकदा टीम इंडियाबद्दल आपला आदर व्यक्त केला आहे. हार-जीतच्या पलीकडे जाऊन खेळ दोन देशांना कसा एकत्र आणू शकतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे.
पाकिस्तानवर भारताचा दणदणीत विजय
आता मॅचबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय महिला संघाने पाकिस्तानवर ७ विकेट्सने मोठा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानी संघ भारतीय गोलंदाजांपुढे गडगडला आणि १८.१ ओव्हर्समध्ये फक्त ५५ रन्सवर ऑलआऊट झाला. भारताकडून श्री चरणीने फक्त ७ रन्स देत ३ विकेट्स घेतल्या आणि तिला 'प्लेअर ऑफ द मॅच'चा किताब मिळाला. हे छोटंसं लक्ष्य भारताने फक्त ९ व्या ओव्हरमध्ये ३ विकेट्स गमावून सहज पार केलं.
