India vs Pakistan Asia Cup Final: आशिया चषक फायनलमध्ये भारतासमोर पाकिस्तानचा संघ १४७ धावांवर सर्वबाद झाला. भारताची सुरवात संथ झाली. काही विकेट्स लवकर गमावल्या. पण अखेर भारताने विजयश्री खेचून आणला.
दुबई : पाकिस्तानचा पराभव करून भारताने आशिया चषक २०२५ चे विजेतेपद पटकावले आहे. तिलक वर्मा याने एकट्याने किल्ला लढवत टीम इंडियाला हा किताब मिळवून दिला. पाकिस्तानने विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे भारतीय संघाने ५ गडी गमावून पूर्ण केले. तिलक शेवटपर्यंत क्रीझवर टिकून राहिला आणि त्याने ५३ चेंडूंमध्ये ६९ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त, शिवम दुबेने २२ चेंडूंमध्ये ३३ आणि संजू सॅमसनने २४ धावांचे योगदान दिले. संपूर्ण स्पर्धेत टीम इंडिया अजिंक्य राहिली.
आशिया चषक फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताला विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर नाणेफेक हारून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानला भारतीय फिरकी गोलंदाजांनी रोखले. पाकिस्तानचा संघ १९.१ षटकांत सर्वबाद झाला. कुलदीप यादवने भारतासाठी चार विकेट्स घेतल्या. त्याने चार षटकांत फक्त ३० धावा दिल्या. वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. ३८ चेंडूत ५७ धावा करणारा साहिबजादा फरहान पाकिस्तानचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. फखर जमानने ३५ चेंडूत ४६ धावा केल्या. इतर कोणालाही विशेष कामगिरी करता आली नाही.
पहिल्या विकेटसाठी फरहान-जमान जोडीने ८४ धावांची केली भागीदारी
पाकिस्तानची सुरुवात दमदार झाली होती. पहिल्या विकेटसाठी फरहान-जमान जोडीने ८४ धावांची भागीदारी केली. भारताला ही भागीदारी तोडण्यासाठी दहाव्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. फरहानला बाद करून वरुण चक्रवर्तीने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर सईम अय्युब (१४) आणि जमान यांनी २९ धावांची भागीदारी केली. पण तेराव्या षटकात कुलदीपने अय्युबला बाद केले. अय्युब बाद झाला तेव्हा पाकिस्तानची धावसंख्या दोन गडी बाद ११३ होती.
पाकिस्तानच्या डावाला लागली गळती
त्यानंतर पाकिस्तानच्या डावाला गळती लागली. अवघ्या ३४ धावांत पाकिस्तानने नऊ विकेट्स गमावल्या. अय्युबशिवाय कुलदीपने सलमान आगा (८), शाहीन आफ्रिदी (०) आणि फहीम अश्रफ (०) यांनाही बाद केले. शेवटच्या षटकांमध्ये मोहम्मद नवाज (६) आणि हॅरिस रौफ (६) यांना बाद करून जसप्रीत बुमराहने पाकिस्तानचा डाव संपवला.
या सामन्यासाठी भारताने संघात तीन बदल केले होते. दुखापतग्रस्त हार्दिक पांड्याच्या जागी रिंकू सिंगला संघात स्थान मिळाले. शिवम दुबे आणि जसप्रीत बुमराह यांचेही संघात पुनरागमन झाले. हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांना वगळण्यात आले. पाकिस्तानने संघात कोणताही बदल केला नाही. दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन खालीलप्रमाणे:
भारत: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, अक्षर पटेल, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.
पाकिस्तान: साहिबजादा फरहान, फखर जमान, सईम अय्युब, सलमान आगा (कर्णधार), हुसेन तलत, मोहम्मद हॅरिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ, अबरार अहमद.

