India vs New Zealand 5th T20: कालचा शेवटचा रोमांचक सामना कोणी जिंकला?
India vs New Zealand 5th T20 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 5 सामन्यांची T20i मालिका संपली आहे. या मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी केरळमधील तिरुवनंतपुरम येथे खेळला गेला. हा सामना खूपच रोमांचक झाला. चला जाणून घेऊया, कालचा सामना कोण जिंकलं...

भारताने टॉस जिंकला
तिरुवनंतपुरमच्या ग्रीन फील्ड स्टेडियमवर झालेल्या सामन्यात टीम इंडियाच्या कर्णधाराने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 271 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. फलंदाजीसाठी आलेला संजू सॅमसन पुन्हा एकदा फक्त 6 धावा करून बाद झाला. अभिषेक शर्मा 16 चेंडूत 30 धावा करून बाद झाला. पॉवरप्लेमध्ये तो पुन्हा एकदा वेगवान सुरुवात देण्यात यशस्वी ठरला.
ईशान किशनची दमदार खेळी
खरी मजा तेव्हा आली, जेव्हा पहिली विकेट पडल्यानंतर डावखुरा फलंदाज ईशान किशन क्रीजवर आला. त्याने येताच न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि आपल्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वात मोठी आणि अविस्मरणीय खेळी खेळली. 43 चेंडूंचा सामना करताना ईशान किशनने 102 धावा केल्या, ज्यात 6 चौकार आणि 10 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. त्याच्या T20i कारकिर्दीतील हे पहिले शतक होते. ईशानने सूर्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी 60 चेंडूत 137 धावांची भागीदारी केली.
सूर्या आणि हार्दिकचा धमाका
ईशान किशनशिवाय टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनेही आपली चमक दाखवली. त्याने 33 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकारांसह 63 धावांची वेगवान खेळी केली. तो बाद झाल्यावर हार्दिक पांड्याने जबाबदारी स्वीकारली आणि फक्त 17 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 42 धावा करून बाद झाला. रिंकू सिंगने 8 आणि शिवम दुबेने 2 चेंडूत 1 षटकारासह 7* धावा केल्या, ज्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली.
न्यूझीलंडची दमदार सुरुवात
272 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा फलंदाज फिन ऍलनने एक बाजू सांभाळली. त्याने पहिल्याच चेंडूपासून चौकार आणि षटकार मारायला सुरुवात केली. एक वेळ असे वाटत होते की सामन्यात काहीही होऊ शकते, पण तेव्हाच भारताचा उपकर्णधार अक्षर पटेल आला आणि त्याने फिनला बाद केले. ऍलनने 38 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांसह 80 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर न्यूझीलंडचा संघ कोसळला आणि एकापाठोपाठ एक विकेट पडत गेले.
अर्शदीप सिंगचा पंजा आणि भारताचा विजय
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने या सामन्यात पाच बळी घेत भारताच्या विजयात मोठी भूमिका बजावली. त्याने 4 षटकांत 51 धावा देत 5 बळी घेतले, ज्यामुळे न्यूझीलंडचा संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 225 धावाच करू शकला. अखेरीस टीम इंडियाने हा सामना 46 धावांनी जिंकला आणि 5 सामन्यांची मालिकाही 4-1 ने जिंकली. अक्षर पटेलनेही 4 षटकांत 33 धावा देत 3 बळी घेतले. रिंकू सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला.
ईशान किशन सामनावीर आणि मालिकावीर
संपूर्ण मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ईशान किशनला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. त्याने 4 सामन्यांच्या 4 डावांमध्ये 53.75 च्या सरासरीने आणि 231.18 च्या स्ट्राइक रेटने 215 धावा केल्या, ज्यामुळे त्याला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले. याशिवाय, या सामन्यात शतक झळकावल्याबद्दल त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

