T20 World Cup : अहमदाबादमध्ये झालेल्या T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडला 96 रन्सनी हरवून तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला आहे. संजू सॅमसन, इशान किशन आणि अभिषेक शर्माच्या बॅटिंगने भारताच्या विजयाचा पाया रचला.
T20 World Cup : टीम इंडियाने T20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कायम ठेवलं आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या फायनल मॅचमध्ये भारताने न्यूझीलंडचा 96 रन्सनी मोठा पराभव केला आणि तिसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी उचलली. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंगला आलेल्या भारतासाठी संजू सॅमसनची 46 बॉल्समध्ये 89 रन्सची खेळी मॅचविनिंग ठरली. त्याला इशान किशन (25 बॉल्समध्ये 54) आणि अभिषेक शर्मा (21 बॉल्समध्ये 52) यांनी दमदार अर्धशतकं झळकावून उत्तम साथ दिली. भारताने दिलेल्या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 19 ओव्हर्समध्ये 159 रन्सवर ऑलआऊट झाला. जसप्रीत बुमराहने 4 विकेट्स घेत न्यूझीलंडच्या बॅटिंगचं कंबरडं मोडलं. न्यूझीलंडकडून टीम सायफर्टने 26 बॉल्समध्ये 52 रन्स करत एकाकी झुंज दिली.
न्यूझीलंडकडून सायफर्टशिवाय फक्त मिचेल सँटनर (35 बॉल्समध्ये 43) आणि डॅरिल मिचेल (17) यांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली. पॉवरप्लेमध्येच न्यूझीलंडची अवस्था बिकट झाली होती. फिन ऍलन (9), रचिन रवींद्र (1) आणि ग्लेन फिलिप्स (5) स्वस्तात परतले. त्यानंतर मार्क चॅपमन (3) आणि सायफर्टही आऊट झाल्याने त्यांची अवस्था 5 बाद 72 अशी झाली होती. मिचेल आणि सँटनर यांनी काही वेळ डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण बुमराहने पुन्हा बॉलिंगला येत न्यूझीलंडला गुडघे टेकायला लावले. जेम्स नीशम (8), मॅट हेन्री (0) आणि जेकब डफी (3) हे स्वस्तात बाद झाले. लॉकी फर्ग्युसन 6 रन्सवर नाबाद राहिला.
त्याआधी, संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या जोडीने भारताला जबरदस्त सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 98 रन्सची पार्टनरशिप केली. फॉर्मात परतलेल्या अभिषेकने फक्त 21 बॉल्समध्ये 3 सिक्स आणि 6 फोर मारत 52 रन्स ठोकले. आठव्या ओव्हरमध्ये रचिन रवींद्रच्या बॉलवर तो विकेटकीपरकडे कॅच देऊन आऊट झाला. त्यानंतर आलेल्या इशान किशनने संजूसोबत मिळून 105 रन्सची पार्टनरशिप केली. ही जोडी नीशमने 15 व्या ओव्हरमध्ये फोडली. पहिल्याच बॉलवर संजू 8 सिक्स आणि 5 फोर मारून 89 रन्सवर लाँग ऑनला कॅचआऊट झाला.
त्याच ओव्हरच्या पाचव्या बॉलवर इशान किशनही (54 रन्स) मार्कला कॅच देऊन परतला. त्याच्या खेळीत 4 सिक्स आणि 4 फोर होते. पुढच्याच बॉलवर सूर्यकुमार यादव (0) गोल्डन डकवर आऊट झाला. त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याला (18) फार काही करता आलं नाही, तर तिलक वर्मा (8) थोडा अडखळत खेळला. शेवटच्या ओव्हर्समध्ये शिवम दुबेने फक्त 8 बॉल्समध्ये 26 रन्सची फटकेबाजी करत भारताला 250 रन्सचा टप्पा ओलांडून दिला. भारताने 5 विकेट्स गमावून 255 रन्स केले. न्यूझीलंडकडून जेम्स नीशमने तीन विकेट्स घेतल्या.
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टीम सायफर्ट (विकेटकीपर), फिन ऍलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर (कॅप्टन), मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी.


