आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत, मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात युती होणार का? या प्रश्नावर अखेर शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडत मोठं आणि सूचक वक्तव्य केलं आहे.

मुंबई - राजकारणात पुन्हा एकदा ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ या समीकरणाला नवी दिशा मिळण्याची चिन्हं स्पष्टपणे दिसत आहेत. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत, मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात युती होणार का? या प्रश्नावर अखेर शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडत मोठं आणि सूचक वक्तव्य केलं आहे. दरम्यान, या नवीन समीकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी पत्रकारांसोबत केवळ हात जोडले. प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

उद्धव ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे, तेच होईल. आता संदेश पाठवण्याचा वेळ नाही, थेट बातमीच देणार!" या वक्तव्यामुळे मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीच्या चर्चांना नवसंजीवनी मिळाली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केल्यानंतर लगेचच मनसेकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

मनसेकडूनही युतीचे प्रयत्न

आज राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या उपाध्यक्षांची महत्वाची बैठक मुंबईतील शिवतीर्थ येथे बोलावली होती. या बैठकीत राज ठाकरे कोणता राजकीय संदेश देतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना-मनसे युतीची शक्यता पाहता ही बैठक अधिकच महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी थेट उद्धव ठाकरेंना आवाहन केलं होतं की, "उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना एक फोन करावा." आणि यानंतर अवघ्या काही तासातच उद्धव ठाकरेंकडून युतीवर स्पष्ट आणि थेट भाष्य आलं, हे विशेष लक्षवेधी आहे.

राज ठाकरे नेहमीच अनुकूल

मनसेचे आणखी एक नेते अविनाश जाधव यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हटलं, "आपण एक पाऊल पुढे आलात, तर राज ठाकरे शंभर पावले पुढे येतील, याची आम्हाला खात्री आहे." त्यांनी स्पष्ट केलं की, "युती ही एका दिवसात होत नाही, त्यासाठी प्रक्रिया असते. मात्र सध्या जे राज्यातील कार्यकर्ते, मराठी मतदार आणि सामान्य नागरिक मनात ठेवून आहेत, तेच घडावं हीच आमची इच्छा आहे."

अविनाश जाधव यांनी शिवसेना-मनसे युतीसंदर्भातील संभाव्य मार्गदर्शक प्रक्रिया अधोरेखित करताना स्पष्ट केलं की, "राजकारणात भावनिकता असली तरी निर्णय प्रक्रिया ही स्पष्ट असावी लागते. राज ठाकरे नेहमीच महाराष्ट्राच्या हितासाठी काम करत आले आहेत. त्यामुळे आता पुढचं पाऊल उद्धव ठाकरेंकडून अपेक्षित आहे."

अमित ठाकरेंचाही सुचक संदेश

दरम्यान, अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच सूचक विधान करत म्हटलं होतं की, "दोन्ही भावांकडे एकमेकांचे नंबर आहेत." या विधानावर आता अविनाश जाधव यांनीही ठामपणे समर्थन दर्शवले आहे. "मराठी माणसाच्या हितासाठी एक फोन येणं ही फक्त वेळेची गरज आहे," असंही ते म्हणाले

हेही वाचा - Chinnaswamy Stadium Stampede विराट कोहलीविरुद्ध पोलीस तक्रार दाखल; राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र

मुंबईत नवीन राजकारण

या सगळ्या घडामोडी पाहता शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे या दोन मराठी भावनांचा आधार असलेल्या पक्षांमध्ये युती होण्याची शक्यता प्रबळ झाली आहे. दोन्ही ठाकरे बंधू – राज आणि उद्धव – यांच्यातील वैयक्तिक संबंध, राजकीय समांतरता, आणि मराठी मतदारांचा दबाव यामुळे येत्या काळात एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राजकीय निरीक्षकांच्या मते, जर ही युती झाली तर ती महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणू शकते. विशेषतः मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे यांसारख्या शहरी भागात मराठी मतांची घनता लक्षात घेता ही युती भाजप आणि महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते.

राजकीय युती म्हणजे केवळ गणित नव्हे, ती भावना आणि नेतृत्वाचा संगमही असतो. ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले, तर केवळ एक राजकीय युती होणार नाही, तर अनेक वर्षांपासून दुरावलेली एक घराणेशाही पुन्हा एकत्र येईल. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वपूर्ण ठरेलच, पण मराठी अस्मितेच्या दृष्टीनेही ही एक ऐतिहासिक घडामोड ठरू शकते.