- Home
- Mumbai
- पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! नालासोपाऱ्यात उभारले जाणार नवे रेल्वे स्थानक; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! नालासोपाऱ्यात उभारले जाणार नवे रेल्वे स्थानक; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Alkapuri New Railway Station : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नालासोपारा येथील प्रचार सभेत अलकापुरी परिसरात नवीन रेल्वे स्थानक उभारण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे नालासोपारा स्थानकावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल.

पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! नालासोपाऱ्यात उभारले जाणार नवे रेल्वे स्थानक
ठाणे : पश्चिम रेल्वे मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या नालासोपारा व वसई-विरार परिसरातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलकापुरी परिसरात नव्या रेल्वे स्थानकाच्या उभारणीची घोषणा केली असून, त्यामुळे नालासोपारा रेल्वे स्थानकावरील वाढती गर्दी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी सरकारचा निर्णायक पुढाकार
शुक्रवारी नालासोपारा येथील सेंट्रल पार्कमध्ये भाजपची भव्य प्रचार सभा पार पडली. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नालासोपारा तसेच वसई-विरार परिसराच्या विकासासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. गेल्या काही वर्षांत नालासोपाऱ्याची लोकसंख्या वेगाने वाढली असून, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये येथील मतदार सहभाग लक्षणीय राहिला आहे. ही बाब लक्षात घेऊन परिसरात पायाभूत सुविधा अधिक बळकट केल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अलकापुरीत नवीन रेल्वे स्थानक, गर्दीला मिळणार दिलासा
नालासोपारा रेल्वे स्थानकावर दररोज होणारी प्रचंड गर्दी कमी करण्यासाठी अलकापुरी भागात स्वतंत्र नवे रेल्वे स्थानक उभारण्यात येणार आहे. सध्या वसई-विरार शहरात साधारणपणे पाच किलोमीटर अंतरावरच रेल्वे स्थानके असल्याने प्रवाशांवर मोठा ताण येतो. यामुळे पुढील काळात अडीच-अडीच किलोमीटर अंतरावर नवीन रेल्वे स्थानके उभारण्याचे धोरण राबवले जाणार असून, त्याची सुरुवात अलकापुरी येथील स्थानकापासून होणार आहे.
आधुनिक स्थानके आणि नव्या लोकल सेवांचे आश्वासन
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘अमृत भारत रेल्वे स्थानक योजना’ अंतर्गत रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या योजनेंतर्गत
आधुनिक प्रवासी सुविधा
स्वयंचलित जिने
अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित व्यवस्था
उपलब्ध करून दिल्या जातील.
स्वयंचलित दरवाजे आणि वातानुकूलित डबे असणार
तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या 50:50 भागीदारीत स्वयंचलित दरवाजे आणि वातानुकूलित डबे असलेल्या नव्या लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, या लोकल सेवांसाठी द्वितीय श्रेणीच्या तिकिटांच्या दरात कोणतीही वाढ केली जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

