- Home
- Mumbai
- कल्याण-डोंबिवलीकरांची चंगळ! मेट्रो ५ आणि १२ चा थेट बदलापूर-टिटवाळ्यापर्यंत विस्तार; प्रवासाचा वेळ वाचणार!
कल्याण-डोंबिवलीकरांची चंगळ! मेट्रो ५ आणि १२ चा थेट बदलापूर-टिटवाळ्यापर्यंत विस्तार; प्रवासाचा वेळ वाचणार!
Kalyan Metro 5 and 12 expansion: कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो ५ आणि १२ चा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विस्तारामुळे मेट्रो ५ टिटवाळा आणि बदलापूरपर्यंत, तर मेट्रो १२ कळवा-मुंब्रा परिसराला जोडली जाईल.

कल्याण-डोंबिवलीकरांची चंगळ! मेट्रो ५ आणि १२ चा थेट बदलापूर-टिटवाळ्यापर्यंत विस्तार
ठाणे : मुंबई आणि नवी मुंबईतील अंतर आता केवळ मिनिटांवर येणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि उपनगरातील नागरिकांना वेगवान प्रवासाचा पर्याय देण्यासाठी मेट्रो ५ आणि मेट्रो १२ या मार्गिकांचा मेगा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमएमआरडीए (MMRDA) मुख्यालयात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत या प्रकल्पांच्या आराखड्याला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मेट्रो मार्गिकांचा नवा नकाशा: कुठे जाणार नवीन स्टेशन?
या विस्तारामुळे ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रमुख शहरे मेट्रोच्या नकाशावर येणार आहेत.
मेट्रो ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण): या मार्गिकेचा विस्तार आता दुर्गाडी नाका ते थेट टिटवाळा (५ क) आणि कल्याण-उल्हासनगरमार्गे चिखलोली (५ अ) पर्यंत केला जाईल. चिखलोलीतून ही मेट्रो पुढे थेट बदलापूरपर्यंत (५ ब) नेण्याचे नियोजन आहे.
मेट्रो १२ (कल्याण-तळोजा): ही मार्गिका आता कळवा आणि मुंब्रा परिसराला जोडली जाणार आहे, ज्यामुळे नवी मुंबईचा प्रवास अधिक सुकर होईल.
मेट्रो १४ (कांजूरमार्ग-बदलापूर): या मार्गिकेमुळे बदलापूरकरांना थेट मुंबई गाठणे सोपे होणार आहे.
बदलापूर, अंबरनाथ आणि टिटवाळा आता मुंबईच्या जवळ!
कल्याणच्या पलीकडील शहरांसाठी 'एक्सेस कंट्रोल' मार्ग उभारला जाणार आहे. हा मार्ग बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर आणि डोंबिवलीच्या पूर्व-पश्चिम भागांना जोडेल. विशेषतः चिखलोली रेल्वे स्थानकाजवळ मेट्रोचे जंक्शन उभे राहिल्याने अंबरनाथ-उल्हासनगरच्या रहिवाशांना ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईला जाण्यासाठी लोकलवर अवलंबून राहावे लागणार नाही.
वाहतूक कोंडीवर जालीम उपाय: 'डबल डेकर' मार्ग!
जागेची कमतरता आणि वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता, अनेक महत्त्वाचे प्रकल्प 'डबल डेकर' (Double Decker) पद्धतीने उभारले जाणार आहेत. यात खालील मार्गांचा समावेश आहे.
मेट्रो १२ (कल्याण-तळोजा) आणि मेट्रो ५ चे विस्तारित मार्ग.
शिळफाटा-रांजणोली उन्नत मार्ग.
वालधुनी ते नेवली उन्नत मार्ग.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचना
"मेट्रोच्या या विस्तारामुळे कल्याण पलीकडच्या नागरिकांना मुंबई-नवी मुंबई गाठण्यासाठी एकापेक्षा जास्त पर्याय उपलब्ध होतील. एमएमआरडीएने याचा तातडीने आराखडा तयार करावा." या प्रकल्पांमुळे ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांचा प्रवास केवळ सुखकर होणार नाही, तर रिअल इस्टेट क्षेत्रालाही मोठी चालना मिळणार आहे.

