- Home
- Mumbai
- Mumbai Local : मुंबईकरांची 'लाईफलाईन' आणखी वेगवान! पश्चिम रेल्वेवर १ फेब्रुवारीपासून वाढणार लोकलच्या फेऱ्या; पाहा नवीन वेळापत्रक
Mumbai Local : मुंबईकरांची 'लाईफलाईन' आणखी वेगवान! पश्चिम रेल्वेवर १ फेब्रुवारीपासून वाढणार लोकलच्या फेऱ्या; पाहा नवीन वेळापत्रक
Mumbai Local : पश्चिम रेल्वेवर कांदिवली-बोरिवली सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्याने १ फेब्रुवारी २०२६ पासून लोकलच्या चार नवीन फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे एकूण फेऱ्यांची संख्या १४१० होणार आहे.

पश्चिम रेल्वेवर १ फेब्रुवारीपासून वाढणार लोकलच्या फेऱ्या
Mumbai Local Update : मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम फत्ते झाल्यानंतर, आता १ फेब्रुवारी २०२६ पासून लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे रोजच्या गर्दीतून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कांदिवली-बोरिवली सहाव्या मार्गिकेचा मोठा फायदा
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली आणि बोरिवली दरम्यान सहावी मार्गिका कार्यान्वित झाल्यामुळे रेल्वेचे जाळे अधिक सक्षम झाले आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेवर वळवल्या गेल्यामुळे, आता लोकल गाड्यांसाठीचे ट्रॅक रिकामे झाले असून नवीन फेऱ्या सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
फेऱ्यांची संख्या आता १४१० वर!
या नवीन निर्णयामुळे पश्चिम रेल्वेवरील एकूण फेऱ्यांची संख्या आता १४०६ वरून १४१० इतकी होणार आहे. सध्या सुरू होणाऱ्या या चारही अतिरिक्त फेऱ्या १२ डब्यांच्या आणि नॉन-एसी (साध्या) असणार आहेत.
असे असेल नवीन वेळापत्रक (धीमी मार्गिका)
वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर प्रत्येकी दोन नवीन फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.
१. अप मार्ग (भाईंदरकडून मुंबईच्या दिशेने)
सकाळी ११:३९ वा. - भाईंदर ते वांद्रे (स्लो लोकल)
दुपारी १२:१४ वा. - भाईंदर ते चर्चगेट (स्लो लोकल)
२. डाऊन मार्ग (मुंबईकडून भाईंदरच्या दिशेने)
पहाटे ०४:३० वा. - वांद्रे ते भाईंदर (स्लो लोकल)
दुपारी ०१:२१ वा. - वांद्रे ते भाईंदर (स्लो लोकल)
प्रवाशांना काय फायदा होणार?
सकाळी आणि दुपारच्या वेळी प्रवाशांची मोठी गर्दी असते. या नवीन फेऱ्यांमुळे बोरिवली, भाईंदर आणि वांद्रे परिसरातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर होईल. सहाव्या मार्गिकेमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे लोकलला होणारा उशीरही आता कमी होण्याची शक्यता आहे.

