Mumbai : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्रित येण्याच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी यासाठी काही अटीशर्थी ठेवल्या आहेत. 

Mumbai : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी माणसांच्या हक्कांसाठी एकत्र यावे असे मत आतापर्यंत अनेकांनी व्यक्त केले आहे. परंतु, यावर दोघांनी कधीही स्पष्ट भूमिका मांडली नव्हती. आता राज ठाकरे यांनी मी एकत्र येण्यास तयार असल्याचे एका मुलाखतीत म्हटले आहे. त्यावर उद्धव यांनी काही अटीशर्थी ठेवत आम्हीही एकत्र येण्यास तयार असल्याचे सांगितले आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी दोन्ही ठाकरे एकत्र येणार का, असा सवाल केला. त्यावर राज म्हणाले, की कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडणे अगदी किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. मराठी माणसांच्या अस्तित्वासाठी या शुल्ल्क गोष्टी आहेत. मला तर असेही वाटते, की सर्व पक्षातील मराठी माणसांनी मराठी माणसांसाठी एकत्र आले पाहिजे.

मुंबईच्या दादर येथील श्री छत्रपती महाराज शिवाजी मंदिर स्मारक मंडळात आयोजित भारतीय कामगार सेनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उद्धव म्हणाले, की किरकोळ भांडणं बाजूला ठेवण्याची माझीही तयारी आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन मीही करतो. परंतु, माझी अट अशी आहे, की लोकसभा निवडणुकीत जेव्हा आम्ही सांगत होतो, की राज्यातील कारभार गुजरातला जात आहे तेव्हाच विचार करायला हवा होता. तसे झाले असते तर सरकार तिकडे बसले नसते. महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार केंद्रात असते. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा. आता विरोध करायचा. मग तडजोड करायची. हे चालणार नाही. त्यांना घरी बोलवणार नाही, त्यांच्या पंगतीला बसणार नाही, हे आधी ठरवा. त्यानंतर महाराष्ट्राच्या गोष्टी करा.