मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. पुढील २४ तासांसाठी मुंबईत पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याने मुंबईसह ठाणे, पालघर, विदर्भातही पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बुधवारी सकाळपासून मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे परिसरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. पुढील २४ तासात मुंबई आणि ठाणे विभागासाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय मुंबईत पुढील तीन तासांत रेड अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यभरात मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबईसह रत्नागिरी जिल्ह्यासाठीही हवामान विभागाने रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुढील ७२ तासांसाठी कोकणसह घाट माथ्यावर अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे.
पावसाने उशिरा हजेरी लावल्याने सर्वसामान्यांसह बळीराजाही चिंतेत होता. अनेक नद्या, धरणांची पाणी पातळी खोलवर गेली होती. अखेर पावसाने हजेरी लावल्याने सर्वसामान्यांनाही दिलासा मिळाला आहे. तर पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केल्याने बळीराजाही सुखावला आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी साचलं पाणी
मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. लोकल ट्रेनवरही याचा परिणाम झाला आहे. पावसामुळे लोकल ट्रेन उशिराने धावत असून ठाणे स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. तसंच मुंबईतील अनेक सखल भागात पावसाचं पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू असून मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली आहे.
विदर्भात समाधानकारक पावसाचा अंदाज
कोकण, मुंबई, घाट माथ्यासह विदर्भातही चांगला पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उन्हाळ्यात विदर्भात नागरिकांना मोठ्या उष्णतेचा सामना करावा लागला होता. जून महिना उजाडला तरी तापमानात उष्णता होती. मात्र आता पुढील दोन ते तीन दिवस विदर्भात पावसाचा अंदाज आहे. नागपूरसह विदर्भातील अनेक भागात चांगल्या पावसाचा अंदाज आहे.


