- Home
- Mumbai
- Ganesh Chaturthi 2025 : गणपतीची प्रतिष्ठापना करताना या चुका टाळा, वाचा पूजेचे नियम, साहित्य, प्रक्रिया
Ganesh Chaturthi 2025 : गणपतीची प्रतिष्ठापना करताना या चुका टाळा, वाचा पूजेचे नियम, साहित्य, प्रक्रिया
भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेशाची प्रतिष्ठापना होते आणि भाविक अत्यंत भक्तिभावाने पूजाविधी करतात. मात्र या पूजेमागील शास्त्रोक्त नियम, प्राणप्रतिष्ठा, प्रतीकात्मक अर्थ आणि अध्यात्मिक महत्त्व याची अनेकांना अचूक माहिती नसते. त्यामुळे ही माहिती जाणून घ्या.

पूजेतील नियम आणि साहित्य
गणेश पूजेतील महत्त्वाचा भाग म्हणजे शुद्धी आणि भावपूर्णता. पूजेसाठी जागा स्वच्छ केली जाते, गोमूत्र किंवा विभूतीच्या पाण्याने शुद्धी करून धूप दाखवला जातो. पूजा साहित्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, सुपारी, नारळ, फुले, फळे, तुळशी-दूर्वा आणि मोदक यांसह पन्नासहून अधिक वस्तू आवश्यक असतात. पूजेपूर्वी शंखनाद केला जातो आणि सोवळे किंवा धूत वस्त्र नेसून भक्त पूजा करतात. विशेष म्हणजे २१ पत्री आणि त्यांचे मंत्र यांना गणेश पूजेत विशेष स्थान आहे.
प्राणप्रतिष्ठेची प्रक्रिया
गुरुजींनी स्पष्ट केलं की, प्राणप्रतिष्ठा म्हणजे मूर्तीत देवतेचे तत्त्व आकर्षित करणे. पूजक उजवा हात मूर्तीच्या हृदयावर ठेवून वेदोक्त मंत्र म्हणतो आणि त्यानंतर ध्यान, आवाहन, स्नान, वस्त्र, चंदन, फुले, नैवेद्य, आरती असे षोडशोपचार केले जातात. विसर्जनापूर्वी ‘यान्तु देवगणा:...’ मंत्र म्हणत मूर्ती विसर्जित केली जाते.
अंगपूजा व धूपारती
गणेशाच्या प्रत्येक अवयवाची स्वतंत्र पूजा करण्याची परंपरा आहे. उदाहरणार्थ, "ॐ गणेश्वराय नमः। पादौ पूजयामि।" अशा मंत्रांनी रक्ताक्षतांनी अवयव पूजले जातात. शेवटी धूप आणि दीप अर्पण करून अज्ञानाचा अंधार दूर करण्याचे प्रतीक दर्शवले जाते.
पूजेचा प्रतीकात्मक अर्थ
गणेश हे विघ्नहर्ता. त्यांचे वक्रतुंड हे दुष्ट प्रवृत्तींना योग्य मार्गावर आणण्याचे प्रतीक, लंबोदर हे नकारात्मकता ग्रहण करून नष्ट करणारे तर महाकाय हे असीम शक्तीचे द्योतक मानले जाते. पूजेचा प्रत्येक उपचार हा भक्ताच्या अंत:करणातील देवत्व जागृत करण्याचा टप्पा आहे. त्यामुळे पूजा म्हणजे केवळ विधी नसून एक आध्यात्मिक प्रवास आहे.
चतुर्थीचे महत्त्व
गणेशाचा जन्म चतुर्थीला झाल्याचा उल्लेख पुराणात आहे. म्हणूनच भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी होते. या तिथीला गणेशतत्त्व पृथ्वीवर अत्यंत सक्रिय असते, म्हणून उपासनेतून विशेष लाभ मिळतो. उपवास, पूजन, नामजप यामुळे मन शुद्ध होते आणि विघ्ने नाहीशी होतात.
कोणत्या चुका टाळाव्यात
पूजा यांत्रिकपणे न करता भावपूर्वक करणे महत्त्वाचे आहे. पूजाघर स्वच्छ ठेवणे, निर्माल्य वेळेवर विसर्जित करणे, ताजे साहित्य वापरणे आणि मंत्रांचा योग्य उच्चार करणे गरजेचे आहे. मंत्र माहिती नसल्यास "श्री महागणपतये नमः" हा साधा मंत्र उच्चारला तरी चालतो.
जपाचे महत्त्व
पूजा सिद्धतेपासून ते विसर्जनापर्यंत "ॐ गं गणपतये नमः" किंवा गणपती अथर्वशीर्षाचा जप करणं अत्यंत फलदायी ठरतं. प्रत्येक उपचार अर्पण करताना "सर्वं गणनायकाय समर्पयामि" असा भाव ठेवला तर पूजेतून मिळणारे आध्यात्मिक लाभ अधिक वाढतात.

