- Home
- Mumbai
- ''आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र असले म्हणजे कुणी भारतीय होत नाही'' बॉम्बे हायकोर्टाचे महत्त्वाचे निरिक्षण
''आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र असले म्हणजे कुणी भारतीय होत नाही'' बॉम्बे हायकोर्टाचे महत्त्वाचे निरिक्षण
मुंबई - आपल्याकडे आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदार यादीत नाव, तसेच मतदार ओळखपत्र असेल तर आपण भारतीय आहोत असे प्रत्येकाला वाटते. पण बॉम्बे हायकोर्टने हा दावा फेटाळून लावला आहे. ही कागदपत्रे असली तरी तुम्ही भारतीय ठरत नाहीत, असे सांगितले आहे.

बांगलादेशीकडे सर्व कागदपत्रे
नागरिकत्वाचा दावा ‘नागरिकत्व अधिनियम, १९५५’ अंतर्गत कठोरपणे तपासला जावा, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने बांगलादेशी नागरिक असलेल्या व्यक्तीचा जामीन अर्ज फेटाळला. २०१३ पासून ठाण्यात राहणाऱ्या या व्यक्तीने स्वतःकडे आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र आणि पासपोर्ट असल्याचे सांगितले. त्याची कागदपत्रे आयकर नोंदी, बँक खाती, वीजपाणी सेवा आणि व्यवसाय नोंदणीशी जोडलेली आहेत.
केवळ ओळख पटविण्यासाठी
न्यायमूर्ती अमित बोरकर म्हणाले, “फक्त आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा मतदार ओळखपत्र असणे यामुळेच कोणी भारतीय नागरिक ठरत नाही. ही कागदपत्रे केवळ ओळख पटवण्यासाठी किंवा सेवा मिळवण्यासाठी असतात; परंतु अधिनियमात नमूद केलेल्या मूलभूत कायदेशीर नागरिकत्वाच्या अटींवर त्यांचा परिणाम होत नाही.”
बांगलादेशी जन्मदाखला
वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात बाबू अब्दुल रुफ सरदार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारी वकिलांनी असा आरोप केला की त्याने भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केला आणि बनावट भारतीय ओळखपत्रांचा वापर केला. त्याच्या फोनच्या फॉरेन्सिक तपासात त्याच्या आईचा आणि स्वतःचा बांगलादेशात जारी झालेला जन्म दाखला डिजिटल स्वरूपात सापडला. आधारकार्डची अद्वितीय ओळख प्राधिकरणाकडून (UIDAI) पडताळणी अद्याप बाकी आहे. सरदार अनेक बांगलादेशाशी संबंधित क्रमांकांशी वारंवार संपर्कात होता.
हेतुपुरस्सर प्रयत्न
न्यायमूर्ती बोरकर यांनी म्हटले की या आरोपांमध्ये केवळ तांत्रिक स्थलांतर नियमांचे उल्लंघन नसून “स्वतःची खरी ओळख लपवून भारतीय नागरिकत्वाचे लाभ मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न” दिसून येतो. नागरिकत्व अधिनियमामध्ये नागरिकत्व मिळवणे आणि गमावणे यासाठी कायमस्वरूपी प्रणाली नमूद केलेली आहे.

