सार

मुंबईतील बेस्ट बसने तिकिटे आणि पासचे दर वाढवले आहेत, ज्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे. 9 मेपासून लागू होणाऱ्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक भार पडणार आहे.

मुंबई | प्रतिनिधी मुंबईतील कामगार, विद्यार्थी, नोकरदार वर्गासाठी सकाळच्या धकाधकीतला एक प्रमुख आधार म्हणजे बेस्ट बस. मात्र, आता याच 'बेस्ट'नं प्रवाशांच्या खिशावर अधिक भार टाकत आपली तिकिटं आणि पास दर वाढवले आहेत. 9 मेपासून लागू होणाऱ्या या दरवाढीमुळे सामान्य मुंबईकरांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

नव्या दरानुसार, AC आणि Non-AC दोन्ही प्रकारच्या मासिक पासचे दर वाढवण्यात आले आहेत. रोजचा प्रवास करणाऱ्यांसाठी ही वाढ काही रुपये नाही, तर महिन्याच्या अखेरीस खिशाला जाणवेल अशी आहे. आधीच दररोज महागणाऱ्या भाजीपाला, इंधन, गॅस आणि घरभाड्याच्या गर्दीत आता बेस्टच्या दरवाढीची भर पडली आहे.

"सर्वसामान्यांना फटका, पण सवलती कुठे?"

एका सरकारी कर्मचाऱ्यानं सांगितलं, “महिन्याला आधीच घरखर्च सांभाळणं कठीण होतंय. आता प्रवासासाठी जास्त पैसे द्यावे लागणार... मग बचत कशी करायची?” बेस्ट प्रशासनाने आर्थिक अडचणी आणि देखभालीच्या खर्चाला कारणीभूत ठरवत ही दरवाढ जाहीर केली आहे. पण, यामध्ये सामान्य प्रवाशांची अडचण लक्षात घेतली गेली आहे का, हा मुख्य प्रश्न आहे.