मुळशीतील राष्ट्रवादी नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तिच्या जाऊने सासरच्या भीषण छळाचे धक्कादायक खुलासे केले आहेत. वैष्णवीला साडी नेसण्यापासून ते गाडीच्या मागणीपर्यंत अनेक गोष्टींवरून छळ केला जात होता.

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुळशीतील नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिच्या संशयास्पद मृत्यूनं राज्यभर खळबळ उडवली आहे. वैष्णवीच्या निधनानंतर समोर आलेले खुलासे धक्कादायक असून, तिच्या सासरचं भीषण आणि अमानवीय वास्तव हळूहळू उघड होत आहे. तिच्यावर केवळ मानसिकच नव्हे, तर शारीरिक छळ होत असल्याचे पुरावे आणि साक्षीदार पुढे येत आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

वैष्णवीची जाऊ, मयुरी हगवणे हिने माध्यमांसमोर अत्यंत धक्कादायक माहिती दिली आहे. मयुरीच्या म्हणण्यानुसार, “हे संपूर्ण कुटुंब क्रूरतेच्या काठावर जगत होतं. माझ्या नवऱ्यालाही कळलं होतं की, हे लोक मला जिवंत ठेवणार नाहीत. म्हणून त्याने मला माहेरी सोडलं. आम्ही स्वतः वैष्णवीला त्रास होत असल्याचं पाहिलं होतं, पण आमचं बोलणंही शक्य नव्हतं.”

छोट्या गोष्टींवरून छळ, मानसिक दडपणाचा कहर

मयुरीच्या सांगण्यानुसार, वैष्णवीला अगदी साडी कशी नेसते, कपडे कसे घालते, सासऱ्याकडे पाहते की नाही यावरून देखील दोष दिले जायचे. तिची नणंद करिष्मा, सासू आणि दीर मिळून सतत टोचणी, अपमान आणि मानसिक छळ करत होते. “लग्नाच्या महिनाभरातच मला टॉर्चर सुरू झालं होतं. आम्ही स्वतंत्र खोलीत राहायला लागलो. पण तिथेही मानसिक त्रास थांबला नाही,” असं मयुरीने सांगितलं.

‘फॉर्च्युनर’ मागणी आणि ब्रँडेड हट्ट

वैष्णवीच्या सासूबाई एकदा फोनवर तिच्या आईसोबत बोलताना म्हणाल्या, “फॉर्च्युनर पाहिजेच. ब्रँडेड गाड्या असल्या की शोभा वाढते.” मयुरीच्या म्हणण्यानुसार, तिचा दीर शशांक हगवणे याने वैष्णवीकडून गॉगल, मोबाईल, घड्याळ यांसारख्या महागड्या वस्तू मागवून घेतल्या होत्या. त्याच वस्तूंनी तो घरात माज दाखवत असे, "मी तिला किती धाकात ठेवलंय, बघा!"

दुसरीकडे डोळे झाकणारी व्यवस्था

मयुरी सांगते की, वैष्णवीवर होणाऱ्या अत्याचारांची माहिती घरातील काम करणाऱ्या लोकांमुळेच मिळत होती. “ते सांगायचे की वैष्णवीला मारहाण झाली. पण आम्ही काहीच बोलू शकत नव्हतो. माझा नवरा दीराला समजवायचा, पण तो उलट सांगायचा, 'तुमचं तुम्ही बघा.'” या घरात मानवी मूल्यांची कुठलीही जाणीव उरलेली नव्हती, असं स्पष्टपणे दिसून येतं.

दहा महिन्यांच्या बाळालाही अज्ञात ठिकाणी नेलं

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं केवळ दहा महिन्यांचं बाळही बेपत्ता झालं होतं. त्याची नोंद निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे असल्याचं आढळून आलं. अखेर हे बाळ पुन्हा तिच्या माहेरच्या कुटुंबाकडे पोहोचलं आहे. या घटनेमुळे कुटुंबातील आणखी अनेक काळे पडदे उघड होण्याची शक्यता आहे. ही केवळ एका स्त्रीच्या छळाची गोष्ट नाही, तर आपल्या समाजातील स्त्रीविरोधी मानसिकतेचं वेदनादायी दर्शन आहे. या प्रकरणात निष्पक्ष आणि कठोर कारवाई होणं आवश्यक आहे, अन्यथा अशा अनेक वैष्णवींच्या कहाण्या कायमच अंधारातच राहतील.