Manisha Kayande on Ashadi Wari : राज्य विधान परिषदेत शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी आरोप केला आहे की शहरी नक्षलवादी विविध संघटनांच्या नावाखाली वारकरी संप्रदायात शिरून प्रचार करत आहेत आणि वारकऱ्यांच्या श्रद्धेवर घाला घालत आहेत.
मुंबई : पंढरपूरच्या विठुरायाच्या आषाढी वारीत लाखो वारकरी सहभागी होत असताना, राज्य विधान परिषदेच्या सभागृहात शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी एक धक्कादायक आणि लक्ष वेधून घेणारा आरोप केला आहे. त्यांच्या मते, शहरी नक्षलवादी विविध संघटनांच्या नावाखाली वारकरी संप्रदायात शिरून प्रचार करत आहेत, आणि वारकऱ्यांच्या श्रद्धेवर घाला घालत आहेत.
कायंदेंचा खळबळजनक दावा
मनीषा कायंदे म्हणाल्या, "वारी म्हणजे वैष्णवांची, भक्तीची, आणि श्रद्धेची परंपरा आहे. पण गेल्या काही काळात या वारीत देव न मानणाऱ्या, नास्तिक विचारसरणीच्या लोकांचा शिरकाव झाला आहे. 'संविधान दिंडी', 'पर्यावरण वारी', 'लोकायत' अशा नावांखाली हे लोक वारीत प्रवेश करतात, भाषणं करतात आणि लोकांचा बुद्धीभेद करतात." त्या पुढे म्हणाल्या, "हे लोक देवापासून लोकांना दूर करत आहेत. यामागे एक मोठं षडयंत्र आहे. हिंदू धर्म आणि वारकरी परंपरेवर थेट हल्ला होत आहे. हे थांबवायला हवं."
कायंदेंची मागणी, तात्काळ कारवाई करा
मनीषा कायंदे यांनी यावर त्वरित राज्य शासनाने कारवाई करण्याची मागणी केली आहे. "वारीमध्ये धार्मिक अपवित्रता पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रोखा. काही लोकांनी मागील वर्षी मटणाचे तुकडे टाकण्यासारखे कृत्य केले होते. हभप बंडातात्या कराडकर यांनीही यावर वारंवार आवाज उठवला आहे," असे त्या म्हणाल्या.
महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक लवकरच
या पार्श्वभूमीवर कायंदे यांनी स्पष्ट केलं की, "राज्य सरकार लवकरच 'महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक' घेऊन येणार आहे. हे अशा कारवायांना रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल."
वारी ही भक्ती आणि श्रद्धेचा उत्सव असताना, त्यात कोणत्याही प्रकारची विघ्नं येणे हे अत्यंत चिंताजनक आहे. मनीषा कायंदे यांच्या विधानाने राजकीय आणि धार्मिक वर्तुळात खळबळ उडाली असून, सरकार आता या आरोपांची गंभीर दखल घेते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


