राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. डिसेंबर ते जानेवारी दरम्यान महानगर पालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. VV-PAT यंत्रे वापरण्यात येणार नाहीत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. आता निवडणूक आयोगाने याबद्दलची माहिती दिली आहे. या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्याटप्याने होणार असून डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान महानगर पालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.

आढावा बैठक कधी होणार? 

नाशिकमध्ये पार पडलेल्या बैठकीत वाघमारे यांनी ही माहिती दिली आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असणारे अधिकारी, कर्मचारी व तांत्रिक यंत्रणा यांचा आढावा देखील बैठकीत घेण्यात आला. डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. स्थानिक स्वराज्य स्थंस्थांच्या निवडणुकांमध्ये VV-PAT यंत्रे वापरण्यात येणार नाहीत, असे संकेत अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आले आहेत.

प्रभाग रचनेवर काम सुरु 

प्रारूप प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे. 1 जुलै 2025 पर्यंतच्या मतदार यादीच्या आधारे निवडणूक घेण्यात येणार आहे. SC-ST आरक्षण निश्चित असते, परंतु OBC आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार लॉटरी पद्धत अवलंबली जाणार असल्याचेही वाघामारे यांनी यावेळी स्पष्ट केले.

मागील निवडणुकांमध्ये OBC आरक्षण होते आणि यावेळी तेच तत्व पाळले जाणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितलं आहे. त्यांनी यावेळी बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाबाबत माहिती दिली आहे. अ, ब आणि क वर्ग महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश जारी झाले आहेत.

वर्गवारीनुसार महानगरपालिकांची केली प्रतवारी 

त्यानुसार ‘अ’ वर्ग महानगरपालिकेत पुणे, नागपूर, ‘ब’ वर्ग महानगरपालिकेत ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड तर, ‘क’ वर्ग महानगरपालिकांमध्ये नवीमुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजी नगर , कल्याण-डोंबिवली महापालिकांचा समावेश आहे. त्यामुळं आता लवकरच निवडणुकांचे पडघम वाजतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.