नुकत्याच झालेल्या दहावीच्या मराठी परीक्षेतील व्याकरणाचे प्रश्न अत्यंत सोपे असल्याने वाद निर्माण झाला आहे. 'घर'चा समानार्थी किंवा 'रात्र'चा विरुद्धार्थी शब्द यांसारखे तिसरी-चौथीच्या स्तरावरील प्रश्न विचारल्याने शिक्षणतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

मुंबई : "दहावीची परीक्षा म्हणजे आयुष्याचा मोठा टप्पा" हे समीकरण आता बदलावे लागणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या दहावीच्या मराठी (प्रथम भाषा) विषयाच्या पेपरमधील व्याकरणाच्या प्रश्नांनी सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रश्नांची पातळी इतकी प्राथमिक आहे की, हा पेपर बोर्डाचा आहे की चौथीच्या वर्गातील घटक चाचणीचा, असा सवाल आता विचारला जात आहे.

नेमका वाद काय? (The Context)

दहावीच्या बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमतेची आणि प्रगल्भतेची चाचणी होणे अपेक्षित असते. मात्र, २०२६ च्या मराठीच्या पेपरमध्ये व्याकरणाच्या विभागात विचारलेले प्रश्न पाहून शिक्षणक्षेत्रातून आश्चर्य व्यक्त होत आहे.

प्रश्नपत्रिकेतील काही 'नमुनेदार' प्रश्न

समानार्थी शब्द: घर, नदी.

विरुद्धार्थी शब्द: रात्र, हजर.

वचन बदला: पुस्तक, झाडे.

हे शब्द इयत्ता तिसरी किंवा चौथीच्या स्तरावर शिकवले जातात. दहावीच्या विद्यार्थ्याला 'घर' किंवा 'रात्र' यांसारखे शब्द विचारणे म्हणजे त्यांच्या बौद्धिक क्षमतेची थट्टा आहे, असे मत तज्ज्ञांनी मांडले आहे.

तज्ज्ञांचा 'रूक' आणि संताप

शिक्षणाचे बाजारीकरण आणि केवळ 'पास' होण्यावर दिलेला भर यामुळे गुणवत्तेचा दर्जा खालावत असल्याची टीका होत आहे.

बौद्धिक क्षमतेचे अवमूल्यन: "केवळ निकाल १०० टक्के लावण्यासाठी अशा साध्या प्रश्नावलीद्वारे आपण भावी पिढीच्या गुणवत्तेशी प्रतारणा करत आहोत," अशी जळजळीत टीका मराठी एकीकरण समितीचे आनंदा पाटील यांनी केली आहे.

शैक्षणिक धोरणावर प्रश्नचिन्ह: आठवीपर्यंत सरसकट उत्तीर्ण करण्याच्या धोरणामुळे आधीच मुलांच्या पाया कच्चा राहत आहे, त्यात दहावीची ही काठिण्यपातळी भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी घातक ठरेल, असा सूर महेंद्र गणपुले (माजी उपाध्यक्ष, मुख्याध्यापक महासंघ) यांनी व्यक्त केला.

भाषेची समृद्धी धोक्यात: भाषा विकास होऊन ही पिढी प्रगल्भ होणे गरजेचे आहे. व्याकरणाच्या सोप्या प्रश्नांमध्ये सुधारणा व्हायला हवी, असे सुशील शेजुळे (मराठी अभ्यास केंद्र) यांनी स्पष्ट केले.

गुणवत्तेपेक्षा टक्केवारी महत्त्वाची?

बोर्डाच्या या भूमिकेमुळे 'शिक्षण' केवळ कागदावरच्या गुणांपुरते मर्यादित राहतेय का? मराठी भाषेच्या समृद्धीसाठी विद्यार्थ्यांना दर्जेदार शब्दसंग्रह आणि व्याकरणाचे सखोल ज्ञान देणे हे बोर्डाचे कर्तव्य आहे. मात्र, अशा 'पाळण्यातल्या' प्रश्नांमुळे दहावीच्या परीक्षेचे गांभीर्य कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे.