shirdi sai prasadalaya menu change: इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळे शिर्डीच्या प्रसिद्ध साई प्रसादालयावर मोठे संकट आले आहे. इंधन बचतीसाठी जेवणाच्या मेन्यूमध्ये कपात करण्यात आली असून, दररोजच्या दोन भाज्यांऐवजी आता एकच भाजी दिली जात आहे. यासोबतच, मोफत भोजन योजनेला स्थानिक पातळीवर विरोधही होत आहे.
शिर्डी: जगप्रसिद्ध शिर्डी येथील साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जगभरातून लाखो भाविक येतात. येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला पोटभर जेवण मिळावे यासाठी 'श्री साई प्रसादालय' अविरत सेवा देत आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या इराण युद्ध आणि आखाती देशांमधील लष्करी संघर्षामुळे या पवित्र स्वयंपाकघरासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
गॅस टंचाईमुळे मेन्यूमध्ये कपात
इराण युद्धामुळे भारतात होणाऱ्या LPG (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) पुरवठ्यावर मर्यादा आल्या आहेत. गॅसची ही टंचाई लक्षात घेता, प्रसादालयातील इंधन वाचवण्यासाठी व्यवस्थापनाने जेवणाच्या मेन्यूमध्ये बदल करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
भाजीमध्ये कपात: दररोजच्या जेवणात दोन भाज्या दिल्या जायच्या, आता इंधन बचतीसाठी केवळ एकच भाजी शिजवली जात आहे.
पर्यायी व्यवस्था: सोमवारी, बुधवारी आणि शनिवारी डाळीऐवजी मसाले भात किंवा पुलाव बनवला जात आहे.
डिझेलचा वापर: गॅस वाचवण्यासाठी आता काही ठिकाणी डिझेलवर चालणाऱ्या यंत्रणेचा आधार घ्यावा लागत आहे.
आशियातील सर्वात मोठे 'हायटेक' स्वयंपाकघर
शिर्डीचे हे प्रसादालय साधेसुधे नाही, तर ते आशियातील सर्वात मोठे प्रसादालय मानले जाते.
प्रचंड क्षमता: एकाच वेळी ३,५०० लोक बसून जेवू शकतात.
रोजची गर्दी: दिवसाला सरासरी ५० हजार लोक येथे जेवतात, तर सणासुदीला ही संख्या १.१८ लाखांच्या वर जाते.
मोफत भोजन: २०१७ पासून भाविकांसाठी हे भोजन पूर्णपणे मोफत करण्यात आले आहे.
सौर ऊर्जेचा वापर, पण मर्यादा...
शिर्डीत जगातील सर्वात मोठी सोलर कुकिंग सिस्टम आहे. वाफेच्या साह्याने येथे डाळ आणि भात शिजवला जातो. मात्र, भाज्यांची फोडणी किंवा तळणाचे पदार्थ करण्यासाठी सोलरचा वापर करता येत नाही, त्यासाठी गॅस किंवा इतर इंधनावरच अवलंबून राहावे लागते. याच कामासाठी आता गॅसची कमतरता भासत आहे.
राष्ट्रपतींनाही भुरळ: २०२३ मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी येथे मराठमोळ्या भोजनाचा आस्वाद घेतला होता. इतकेच नाही तर, येथील दोन आचाऱ्यांना राष्ट्रपती भवनातील आचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी दिल्लीला पाचारण करण्यात आले होते.
स्थानिकांचा वाढता विरोध?
एकीकडे इंधनाचे संकट असताना, दुसरीकडे शिर्डीतील मोफत भोजन योजनेवरून नवा वाद उफाळून आला आहे. मोफत जेवणामुळे शिर्डीत भिकारी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा वावर वाढल्याचा आरोप स्थानिक रहिवासी आणि काही नेत्यांनी केला आहे. भाजप नेते डॉ. सुजय विखे-पाटील यांनीही मोफत भोजन योजना बंद करून पुन्हा नाममात्र शुल्क आकारण्याची मागणी केली आहे.


