Shaktipeeth Expressway : शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या मूळ आराखड्यात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. या बदलामुळे सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील अनेक तालुके महामार्गाच्या नकाशातून वगळले जाऊ शकतात.
मुंबई : नागपूर ते गोवा या महत्त्वाकांक्षी 'शक्तिपीठ महामार्गा'बाबत (Shaktipeeth Expressway) मोठी अपडेट समोर येत आहे. सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध पाहता, राज्य सरकारने या महामार्गाच्या मूळ आराखड्यात (Alignment) मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, या बदलामुळे आता काही तालुके या नकाशातून पूर्णपणे वगळले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नेमका बदल काय आणि का?
शेतकऱ्यांची सुपीक बागायती जमीन आणि पाण्याचे स्रोत वाचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्गाची नव्याने आखणी करण्याची घोषणा केली आहे. नव्या प्रस्तावानुसार, हा मार्ग धाराशिवपासून वळवून सांगलीच्या आटपाडीमार्गे चंदगडकडे नेण्याचा विचार सुरू आहे.
कोणाला बसणार फटका? (प्रस्तावित बदल)
जर महामार्गाची नवी आखणी तुळजापूर-करकंब-शिखर शिंगणापूरमार्गे साताऱ्याकडे वळवली गेली, तर खालील परिणाम होऊ शकतात.
वगळले जाणारे तालुके: सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर आणि सांगोला हे चार महत्त्वाचे तालुके महामार्गाच्या नकाशातून बाहेर पडू शकतात.
जिल्ह्यावर परिणाम: सांगली जिल्हा या महामार्गाच्या मूळ नकाशातून पूर्णपणे वगळला जाण्याची शक्यता आहे.
नवा समावेश: मूळ मार्गाऐवजी आता माढा आणि माळशिरस या तालुक्यांतून हा महामार्ग जाण्याची चर्चा सुरू आहे.
संघर्ष अधिक तीव्र, बार्शीत राज्यस्तरीय मेळावा
दुसरीकडे, महामार्गाला होणारा विरोध कमी झालेला नाही. 'बार्शी तालुका शक्तिपीठ विरोधी संघर्ष समिती'च्या वतीने आज, बुधवारी (७ जानेवारी) रुई (भालगाव) येथे मोठ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. १० जिल्ह्यांतील शेतकरी एकत्र येऊन या महामार्गाविरोधात पुढील रणनीती ठरवणार आहेत.
संभ्रम आणि सोशल मीडियावरील वॉर
नवा मार्ग नेमका कुठून जाणार, याबाबत अधिकृत राजपत्र (Gazette) अद्याप आलेले नाही. मात्र, सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटले आहे. वैराग परिसरात "कोणीही जमीन विकू नका" अशा पोस्ट व्हायरल होत आहेत, तर काही भागांत या बदलाचे स्वागत होत आहे.


