भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नाव चर्चेत आल्यानंतर रूपाली चाकणकर यांनी आधी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आता वाढत्या दबावामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Rupali Chakankar Resign : राज्यात गाजत असलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाचे पडसाद आता राजकारणातही उमटू लागले आहेत. या प्रकरणाशी संबंधित व्हिडिओ समोर आल्यानंतर आधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणाऱ्या रूपाली चाकणकर यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे.

वाढता दबाव आणि अंतर्गत नाराजी

अशोक खरातला ‘गुरू’ मानल्यामुळे रूपाली चाकणकर यांच्यावर सर्व स्तरांतून टीका होत होती. विरोधकांसह पक्षातील काही नेत्यांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्याकडेही याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. अखेर वाढता राजकीय दबाव लक्षात घेता चाकणकर यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला.

सुनेत्रा पवार यांना पत्रातून राजीनामा

रूपाली चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून आपला राजीनामा सादर केला. या पत्रात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत, “मी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, कृपया तो स्वीकारावा,” असे नमूद केले. सध्याची परिस्थिती वेदनादायक असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

Scroll to load tweet…

“गैरकृत्यांशी माझा संबंध नाही”

चाकणकर यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले की, अशोक खरातच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा गैरकृत्यात त्यांचा संबंध नाही. त्यांनी सुरुवातीपासूनच आपली भूमिका स्पष्ट केल्याचे सांगितले. “कोणतेही ठोस पुरावे नसताना माध्यमांमधून होणारे आरोप वेदनादायक आहेत. सत्य लवकरच समोर येईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘गुरू मानले, पण कृत्यांची कल्पना नव्हती’

महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतरही चाकणकर यांनी आपली बाजू मांडली होती. त्यांनी कबूल केले की, त्यांनी अशोक खरातला गुरू मानले होते, मात्र त्याच्या गैरकृत्यांची माहिती नव्हती. प्रकरण उघड झाल्यानंतर त्यांनी स्वतः कठोर कारवाईची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.

पुढील राजकीय निर्णयांकडे लक्ष

चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व, विशेषतः सुनेत्रा पवार, याबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.