- Home
- Maharashtra
- सिंहगड एक्स्प्रेसचा प्रवास होतोय कठीण! पुणे-मुंबई प्रवाशांची रेल्वेकडे मोठी मागणी; डब्यांची संख्या वाढणार का?
सिंहगड एक्स्प्रेसचा प्रवास होतोय कठीण! पुणे-मुंबई प्रवाशांची रेल्वेकडे मोठी मागणी; डब्यांची संख्या वाढणार का?
Pune-Mumbai Railway Update: सिंहगड एक्स्प्रेसमधील डब्यांची संख्या कमी झाल्याने प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतो. या समस्येमुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली असून प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे डबे वाढवण्यासह विविध मागण्या केल्या.

सिंहगड एक्स्प्रेसचा प्रवास होतोय कठीण! पुणे-मुंबई प्रवाशांची रेल्वेकडे मोठी मागणी
Pune-Mumbai Railway Update: पुणे आणि मुंबई या दोन शहरांना जोडणारी जीवनवाहिनी म्हणजे 'सिंहगड एक्स्प्रेस'. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या गाडीतील गर्दीने उच्चांक गाठला असून प्रवाशांना, विशेषतः महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रवासी संघटना आता आक्रमक झाल्या आहेत.
काय आहे नेमकी समस्या?
सिंहगड एक्स्प्रेसमध्ये दररोज हजारो चाकरमानी आणि विद्यार्थी प्रवास करतात. मात्र, डब्यांच्या कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
डब्यांची घटलेली संख्या: कोरोना काळापूर्वी सिंहगड एक्स्प्रेसला १९ डबे होते, जे आता केवळ १४ वर आले आहेत.
जनरल डब्यांची कमतरता: सध्या केवळ एकच जनरल डबा उपलब्ध असल्याने प्रवाशांना उभे राहायलाही जागा मिळत नाहीये.
पासधारक विरुद्ध तिकीटधारक: जागा मिळत नसल्याने सामान्य तिकीटधारक प्रवासी 'मासिक पास' (MST) धारकांच्या डब्यात शिरतात, ज्यामुळे दररोज वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.
तरुणी आणि महिला प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात
प्रवासात होणाऱ्या या गर्दीचा सर्वाधिक फटका महिला प्रवाशांना बसत आहे. राखीव डब्यात होणाऱ्या घुसखोरीमुळे महिलांना प्रवास करणे असुरक्षित वाटत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन पुणे-मुंबई-पुणे रेल्वे प्रवासी संघटनेने मध्य रेल्वे प्रशासनाकडे महत्त्वाची मागणी केली आहे.
प्रवासी संघटनेच्या प्रमुख मागण्या
रेल्वे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात खालील मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
स्वतंत्र महिला डबा: मासिक पासधारक महिलांसाठी राखीव डब्याची स्वतंत्र सोय करावी.
डब्यांची संख्या वाढवा: गाडीला पूर्वीप्रमाणेच किमान ३ जनरल डबे पुन्हा जोडण्यात यावेत.
कठोर तिकीट तपासणी: डेक्कन क्वीन, प्रगती आणि सिंहगड एक्स्प्रेसमध्ये नियमितपणे तिकीट तपासणीची मोहीम राबवावी.
प्रवासी संघटनेने यासाठी सह्यांची मोहीम देखील राबवली असून, आता रेल्वे प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

