OBC Reservation: मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर ओबीसी समाजात असंतोष पसरला आहे. 

मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन सुरू केले असतानाच, आता राज्यात ओबीसी समाजातही तीव्र असंतोष पसरला आहे. आपल्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी ओबीसी बांधव आक्रमक झाले असून, त्यांनी मुंबईत 'जशास तसे' आंदोलन करण्याची तयारी केली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

नागपुरात ओबीसींचे साखळी आंदोलन

जरांगे पाटलांच्या आंदोलनाला थेट प्रत्युत्तर म्हणून नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाने साखळी उपोषणाची सुरुवात केली आहे. बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनाला पहिल्याच दिवशी सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला. यामध्ये काँग्रेसचे खासदार नामदेव किरसान, भाजपचे आमदार परिणय फुके, आणि माजी आमदार आशिष देशमुख यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले.

ओबीसी महासंघाने सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला, तर हे साखळी उपोषण आमरण उपोषणात बदलले जाईल. तसेच, गरज पडल्यास मुंबईत मोठ्या संख्येने कूच करून जरांगे पाटलांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.

सरकारसमोर मोठी कसोटी

मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आणि ओबीसी समाजाचा आरक्षणाला धक्का न लावण्याचा निर्धार यामुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे. एका बाजूला मराठा आंदोलन आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाचा आक्रमक पवित्रा यामुळे दोन्ही समाजांना नाराज न करता तोडगा काढणे हे सरकारसाठी मोठे आव्हान आहे. सरकार या दोन्ही समाजांच्या मागण्यांची पूर्तता कशी करणार, हे येत्या काळात पाहणे महत्त्वाचे ठरेल.