- Home
- Maharashtra
- नाशिककरांचा मुंबई प्रवास होणार 'कूल'! अवघ्या २ तासांत गाठता येणार मुंबापुरी; पाहा काय आहे गुड न्यूज
नाशिककरांचा मुंबई प्रवास होणार 'कूल'! अवघ्या २ तासांत गाठता येणार मुंबापुरी; पाहा काय आहे गुड न्यूज
Nashik Mumbai AC Local Train Update: नाशिक ते मुंबई एसी लोकल सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असून यामुळे प्रवासाचा वेळ २ तासांवर येणारय. कसारा घाटातील तांत्रिक अडथळे दूर करून हा प्रवास आरामदायी होणार असल्याने नाशिकच्या विकासालाही चालना मिळेल.

नाशिककरांचा मुंबई प्रवास होणार 'कूल'! अवघ्या २ तासांत गाठता येणार मुंबापुरी
नाशिक : दररोज कामानिमित्त नाशिक-मुंबई अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. नाशिक ते मुंबई हा प्रवास आता केवळ वेगवानच नाही, तर 'एसी लोकल'मुळे अधिक आरामदायी आणि गारेगार होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मक माहिती दिली असून नाशिककरांच्या स्वप्नपूर्तीचे संकेत दिले आहेत.
प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार!
नाशिक आणि मुंबई ही दोन महत्त्वाची शहरे जोडण्यासाठी सध्या रेल्वेवर मोठा ताण आहे. प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आता मुंबई-नाशिक एसी लोकल सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. गिरीश महाजन यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात स्पष्ट केले की, ही सेवा सुरू झाल्यास नाशिक ते मुंबई हे अंतर अवघ्या दोन तासांत पार करणे शक्य होईल.
कसारा घाटातील अडथळा दूर होणार?
सध्या मुंबईची लोकल सेवा केवळ कसाऱ्यापर्यंत मर्यादित आहे. कसारा ते नाशिक दरम्यान लोकल सुरू करण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले, मात्र कसारा घाटातील तांत्रिक अडचणींमुळे साधी लोकल चालवणे कठीण जात होते. मात्र, एसी लोकलसाठी अशा तांत्रिक अडचणी येणार नाहीत, असे तांत्रिक विश्लेषण समोर आले आहे. त्यामुळे कसाऱ्यापुढील रेल्वेचा प्रवास आता थेट नाशिकपर्यंत विस्तारला जाण्याची शक्यता आहे.
औद्योगिक आणि आर्थिक क्रांतीला वेग
ही एसी लोकल सेवा केवळ प्रवासासाठीच नाही, तर नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी गेमचेंजर ठरणार आहे.
वेळेची बचत: प्रवासाचा वेळ कमी झाल्याने नोकरी आणि व्यवसायासाठी ये-जा करणे सोपे होईल.
आर्थिक विकास: दोन्ही शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढल्याने औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळेल.
आरामदायी प्रवास: घाटातील प्रवासाचा थकवा एसी लोकलमुळे कमी होणार आहे.

