- Home
- Maharashtra
- MSRTC ST Bus: 'लालपरी'चा प्रवास आता 'हायटेक' आणि सुरक्षित! एसटी महामंडळाचा १११ कोटींचा मास्टरप्लॅन; ७ हजार कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
MSRTC ST Bus: 'लालपरी'चा प्रवास आता 'हायटेक' आणि सुरक्षित! एसटी महामंडळाचा १११ कोटींचा मास्टरप्लॅन; ७ हजार कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
MSRTC ST Bus: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांच्या सुरक्षेसाठी १११ कोटीचा प्रकल्प सुरू केला. यात राज्यातील ६३३ महत्त्वाच्या ठिकाणी ७०३५ अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार असून मुंबईतील नियंत्रण कक्षातून त्यावर नजर ठेवली

'लालपरी'चा प्रवास आता 'हायटेक' आणि सुरक्षित! एसटी महामंडळाचा १११ कोटींचा मास्टरप्लॅन
मुंबई : गावागावात पोहोचणारी आपली 'लालपरी' आता अधिक सुरक्षित होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले असून, संपूर्ण राज्यातील एसटी स्थानके आणि आगारांना डिजिटल सुरक्षा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे आता प्रवाशांना निर्धास्तपणे प्रवास करता येणार आहे.
काय आहे एसटीचा 'डिजिटल' सुरक्षा प्लॅन?
एसटी महामंडळाने राज्यातील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सुमारे १११ कोटी रुपयांचा भव्य प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत नेमके काय बदल होणार आहेत.
७,०३५ अत्याधुनिक सीसीटीव्ही: राज्यातील ६३३ महत्त्वाच्या ठिकाणी ७ हजारहून अधिक हाय-डेफिनिशन कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
केंद्रीकृत नियंत्रण (Centralized Control): या सर्व कॅमेऱ्यांचे मुख्य नियंत्रण केंद्र (Control Room) मुंबईत असणार आहे. तिथून राज्यातील कोणत्याही बसस्थानकावरील हालचालींवर एका क्लिकवर लक्ष ठेवता येईल.
चोरी आणि गैरप्रकारांना लगाम: गर्दीच्या ठिकाणी होणारी चोरी, छेडछाड किंवा संशयास्पद हालचालींवर आता २४ तास नजर असेल.
पहिला टप्पा यशस्वी, कुठे बसलेत कॅमेरे?
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर विभागातील ६४ महत्त्वाच्या ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. उर्वरित २७ विभागांमध्ये, तसेच कार्यशाळा आणि विभागीय कार्यालयांमध्ये कॅमेरे बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भोसरी येथील मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था आणि सर्व विभागीय कार्यशाळाही आता या सुरक्षा जाळ्यात येणार आहेत.
एका वर्षात कायापालट!
हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १ वर्षाची मुदत देण्यात आली असून 'टेलिकम्युनिकेशन इंडिया लिमिटेड' या संस्थेकडे याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केवळ स्थानकेच नाही, तर आगारांमधील तांत्रिक कामांवरही यामुळे लक्ष ठेवणे सोपे होईल. आता एसटीने प्रवास करताना तुमची सुरक्षा केवळ चालकाच्या हातात नसून, मुंबईतील हायटेक कंट्रोल रूमच्या नजरेतही असणार आहे!

