विधिमंडळात रमी खेळताना दिसल्याच्या आरोपांनंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील खाते काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या जागी दत्तात्रय भरणे यांची कृषीमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद अखेर त्यांच्या खातेबदलावर येऊन थांबला आहे. अधिवेशनादरम्यान विधिमंडळात रमी खेळताना दिसल्याच्या आरोपांनंतर त्यांच्याकडील कृषी खाते काढून घेण्यात आले आहे. आता त्यांच्या जागी दत्तात्रय भरणे यांची कृषीमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, कोकाटे यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

अधिवेशनातील 'रमी' प्रकरण

हे सर्व प्रकरण पावसाळी अधिवेशनादरम्यान घडले. विधिमंडळाच्या कामकाजादरम्यान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आला. सुरुवातीला त्यांनी हे आरोप फेटाळून लावले, पण विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींच्या अहवालात ते सुमारे २२ ते २४ मिनिटे रमी खेळत असल्याचे निष्पन्न झाले. या अहवालानंतर त्यांच्यावर मोठी कारवाई होणार असल्याची शक्यता होती. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली होती. मात्र, त्यांची थेट हकालपट्टी करण्याऐवजी त्यांचे खाते बदलण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

अजितदादांचा निर्णय आणि रणनीती

अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून घेत, पक्षाचा रोष शांत करण्याचा महायुती सरकारचा हा एक प्रयत्न मानला जात आहे. कोकाटे यांच्या जागी कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आलेले दत्तात्रय भरणे हेदेखील अजित पवारांचे विश्वासू सहकारी आहेत. या निर्णयामुळे कोकाटे यांचे कृषी खात्यातून एकप्रकारे 'डिमोशन' झाले आहे, तर भरणे यांना कृषीमंत्री म्हणून 'प्रमोशन' मिळाले आहे. हा निर्णय महायुतीच्या अंतर्गत रणनीतीचा भाग असल्याचे बोलले जात आहे.