- Home
- Maharashtra
- Weather Alert: महाराष्ट्रात अवकाळीचा 'रुद्रावतार'! २१ जिल्ह्यांना हाय-अलर्ट; विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा इशारा
Weather Alert: महाराष्ट्रात अवकाळीचा 'रुद्रावतार'! २१ जिल्ह्यांना हाय-अलर्ट; विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा इशारा
Maharashtra weather update: भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा हाय-अलर्ट जारी केला आहे. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीच्या शक्यतेमुळे अनेक जिल्ह्यांत ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात अवकाळीचा 'रुद्रावतार'! २१ जिल्ह्यांना हाय-अलर्ट
मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामानाने कूस बदलली असून अवकाळी पावसाने राज्याला विळखा घातला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) ३ एप्रिलसाठी राज्यातील तब्बल २१ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यामध्ये काही जिल्ह्यांत 'ऑरेंज अलर्ट' तर काही ठिकाणी 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. जाणून घेऊया तुमच्या जिल्ह्यात हवामानाची स्थिती कशी असेल.
१. उत्तर महाराष्ट्र: जळगाव, अहिल्यानगरला 'ऑरेंज अलर्ट'
उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे. जळगाव आणि अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून येथे गारपिटीचा धोका वर्तवण्यात आला आहे. तर धुळे आणि नाशिक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट असून येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
२. मराठवाडा: ५ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचे सावट
मराठवाड्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता आहे. हिंगोली, परभणी, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. तसेच धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यामुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
३. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणची स्थिती
पश्चिम महाराष्ट्र: पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार असून येथे येलो अलर्ट जारी केला आहे. कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात अलर्ट नसला तरी ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींची शक्यता आहे.
कोकण: मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये अधिकृत अलर्ट नसला तरी समुद्रकिनाऱ्यावर वाऱ्याचा वेग वाढणार असून काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो.
४. विदर्भ: ११ जिल्ह्यांत पावसाची हजेरी
विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदियात अलर्ट नसला तरी पावसाळी वातावरण कायम राहणार आहे. कापूस आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी.
सावधानता बाळगा, प्रशासनाचे आवाहन
हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, हा पाऊस वादळी स्वरूपाचा असल्याने विजा कोसळण्याचे प्रमाण अधिक असू शकते.
विजा चमकत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात उभे राहू नका.
शेतमाल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवा.
शक्य असल्यास पशूंना सुरक्षित गोठ्यात हलवा.

