- Home
- Maharashtra
- Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाची हजेरी! पुढील 24 तास धोक्याचे, 17 जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाची हजेरी! पुढील 24 तास धोक्याचे, 17 जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Weather Alert: मोंथा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असून, हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी 17 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुढील 24 तासांसाठी 17 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
मुंबई: मोंथा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा सिलसिला अजून थांबलेला नाही. राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर कायम असून, हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी 17 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. तथापि, 30 ऑक्टोबरपासून पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरीही उत्तरेकडील भाग आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता कायम असल्याचा इशारा दिला गेला आहे.
Thunderstorm accompanied with lightning, heavy to Very Heavy rainfall, gusty winds with speed reaching 40-50 Kmph very likely to occur at isolated places in the districts of Marathwada.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 29, 2025
मुंबई आणि कोकणात पाऊस कायम
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई शहर आणि उपनगरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
कमाल तापमान: 34°C
किमान तापमान: 26°C
उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी भागातही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पावसाला ब्रेक
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आता पावसाचा जोर लक्षणीय घटला आहे. या भागांत हलक्या सरी वगळता हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी ठरत आहे.
उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम
अहिल्यानगर वगळता उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. या भागांत पुढील 24 तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात तीन जिल्ह्यांना अलर्ट
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर बीड, लातूर, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांत हलक्या सरींची शक्यता असून हवामान मुख्यतः आंशिक ढगाळ राहणार आहे.
विदर्भात अजूनही धोका कायम
विदर्भातील वाशिम आणि यवतमाळ वगळता उर्वरित नऊ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
1 नोव्हेंबरपासून पाऊस कमी होणार
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 1 नोव्हेंबरपासून राज्यातील बहुतांश भागांत पावसाची तीव्रता घटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो. मात्र, मागील काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, हवामानातील बदलामुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोका वाढला आहे.
महत्वाची सूचना
हवामान विभागाचा इशारा लक्षात घेऊन नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, अनावश्यक प्रवास टाळावा आणि हवामान अपडेट्सकडे लक्ष ठेवावे.

