विदर्भात ऑगस्ट महिन्यात पावसाची मोठी तूट निर्माण झाली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, 2 ते 5 सप्टेंबरदरम्यान पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई : विदर्भात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. ऑगस्ट महिन्यात विदर्भात सरासरीपेक्षा 70 टक्क्यांहून अधिक पावसाची तूट निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. ही तूट पूर्णपणे भरून निघण्याची शक्यता सध्या कमी असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पण येत्या 2 ते 5 सप्टेंबरदरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यांत दमदार पावसाची शक्यता आहे.

विदर्भातील 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट

नागपूर हवामान विभागाने पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांसाठी 2 ते 5 सप्टेंबरदरम्यान यलो अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत काही ठिकाणी पाऊस आणि मेघगर्जनेसह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय 4 सप्टेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दिवशी काही भागांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ऑगस्टमध्ये पावसाची मोठी तूट

नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण कुमार यांच्या माहितीनुसार, यंदाच्या ऑगस्ट महिन्यात विदर्भात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. अनेक भागांत पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याशिवाय पिकांना पाण्याची गरज भासत आहे. आगामी काही दिवसांत होणारा पाऊस ही तूट कितपत भरून काढतो, याकडे शेतकरी आणि हवामान विभागाचे लक्ष लागले आहे.

एल निनोचा पावसावर परिणाम?

बदलत्या हवामान परिस्थितीमुळे एल निनोचा प्रभाव वाढत असल्याचे सांगितले जात आहे. त्याचा पावसाच्या स्थितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आगामी काळात एल निनोचा प्रभाव आणखी वाढल्यास पावसाचे प्रमाण कमी राहू शकते.त्यामुळे विदर्भात सर्वदूर आणि सातत्यपूर्ण पाऊस होण्याची शक्यता सध्या कमी असल्याचे चित्र आहे.

राज्यातही पावसाची तूट

यंदा संपूर्ण राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याचे या आकडेवारीतून दिसून येते. ऑगस्ट महिन्यात मराठवाड्यात 69 टक्के, विदर्भात 58 टक्के, तर राज्यात सरासरी 46 टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे.