बुलढाण्यातील एका कुटुंबाने अपघाती पती गमावलेल्या सुनेला दुसऱ्यांदा संसार थाटण्यास मदत केली आहे. सासू-सासऱ्यांनी तिचे कन्यादान करून, मुलांना पितृसंग दिला आणि संपत्तीही तिच्या नावावर केली.

बुलढाणा: आजच्या काळात जिथे नात्यांमध्ये स्वार्थ आणि तोडकी नाती अधिक पाहायला मिळतात, तिथे बुलढाण्याच्या एका कुटुंबाने माणुसकीचा खरा अर्थ दाखवून दिला आहे. अपघाती पती गमावलेल्या सुनेला केवळ आधारच नव्हे, तर पुनःश्च संसाराची संधी देत, तिच्या नव्या आयुष्याची सुंदर सुरूवात करून दिली. सासू-सासऱ्यांनी तिचं कन्यादान करत, मुलांनाही पितृसंग दिला आणि संपत्तीही तिच्या नावावर करून माणुसकीचं एक अनमोल उदाहरण समाजासमोर ठेवलं.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

स्वातीचं दु:ख, आणि सासरचं माणूसपण

लाडनापूर (ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा) येथील स्वातीचा विवाह १४ जुलै २०१३ रोजी अकोट तालुक्यातील किनखेड पूर्णा येथील शेतकरी जगदीश केशवराव धनभर यांच्याशी झाला होता. संसार सुखाचा चालला होता. भक्ती (वय १०) आणि प्रसाद (वय ६) ही दोन मुलंही त्यांच्या प्रेमळ नात्याची साक्ष देत होती. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं – १३ ऑगस्ट २०२३ रोजी विजेचा धक्का लागून जगदीश यांचं अकाली निधन झालं.

सासरचं मोठेपण, मुलीसारखी सून

या दुःखद घटनेनंतर, बहुतेक ठिकाणी सून एकटीच पडते. पण धनभर कुटुंबाने स्वातीसाठी मातापित्यांची भूमिका घेतली. त्यांनी केवळ तिची जबाबदारी स्वीकारली नाही, तर नात्यातील अमोल धनभर याच्यासोबत तिचं पुनर्विवाहही स्वतः पुढे होऊन घडवून आणलं. विशेष म्हणजे या विवाहात तिचं कन्यादानही केलं, आणि बंगल्यासह शेतीवाडीची संपत्ती तिच्या नावावर केली.

२ जून – एका नव्या आयुष्याचा नवा दिवस

२ जून २०२५ रोजी स्वाती आणि अमोल यांचा विवाह आप्तस्वकांच्या उपस्थितीत साक्षीदार ठरला एका नव्या जीवनाच्या प्रारंभाचा. अमोलने जगदीशच्या दोन मुलांना आपलंसं केलं, आणि त्यांना पित्याचं छत्र लाभलं. आज या घटनेची चर्चा संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात होत आहे. समाजात साखर पेरणाऱ्या या विचारांची सर्वत्र वाहवा केली जात आहे.

संकटात नात्यांची खरी कसोटी

आजच्या काळात केवळ पैशासाठी नात्यांची मोडतोड करणाऱ्या घटना वाढत असताना, एका साध्या शेतकरी कुटुंबाने दाखवलेला हा माणुसकीचा आदर्श खरंच डोळ्यात पाणी आणणारा आहे. सून म्हणजे ओझं नाही, तर लेकच असते. हे या कुटुंबाने कृतीतून सिद्ध केलं.

स्वाती आणि अमोलच्या या विवाहाने समाजाला नव्या विचारांचा दिशा दाखवला आहे. ही गोष्ट सांगते की, जेव्हा सासर सासरपणाचं कर्तव्य निभावतं, तेव्हा विधवा महिलेलाही नव्या स्वप्नांसाठी पुन्हा एक संधी मिळते. हे उदाहरण केवळ बुलढाण्यासाठी नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.