BMC Elections 2025 : १० डिसेंबरला मतदारयाद्या जाहीर होणार असून १५–२० डिसेंबरदरम्यान आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. प्रताप सरनाईक यांनी जानेवारीत निवडणुकांच्या संभाव्य तारखांचे संकेत दिले.
BMC Elections 2025 : ठाण्यात आयोजित कार्यक्रमात परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाचे संकेत दिले. “मतदारयाद्या १० डिसेंबरपर्यंत जाहीर होतील, तर २२ डिसेंबरला प्रभागनिहाय याद्या देण्यात येणार आहेत. त्यामुळे १५ ते २० डिसेंबरदरम्यान आचारसंहिता लागू शकते आणि १५ ते २० जानेवारीदरम्यान निवडणुका होऊ शकतात,” असे त्यांनी सांगितले. यामुळे बीएमसीसह राज्यातील इतर महापालिका निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता बलवत्तर झाली आहे.
विकासकामांमुळे शिवसेना नेहमी सज्ज – सरनाईक
सरनाईक यांच्या ओवळा-माजिवडा मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा गुरुवारी पार पडला. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी “निवडणुका कधीही झाल्या तरी आमचे शिवसैनिक नेहमी नागरिकांमध्ये असतात आणि ३६५ दिवस काम करतात,” असा विश्वास व्यक्त केला. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निधीतून जलतरण तलाव, समाजभवन, स्मशानभूमी यांसारख्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. आनंदनगर येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे दोन जलतरण तलाव तसेच फुटबॉल टर्फचे लोकार्पणही या वेळी झाले.
पुणे महापालिकेत बैठका आणि प्रकल्पांची धावपळ
निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वाढल्याने पुणे महापालिकेतही हालचालींना वेग आला आहे. आयुक्तांनी गुरुवारी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा, मंजूर प्रकल्प, निविदा प्रक्रिया आणि कार्यादेश यांचा पुनरावलोकन करण्यात आला. पालिका पूर्णत्वास गेलेल्या प्रकल्पांच्या उद्घाटनांचे सत्रही लवकरच सुरू होणार असल्याची चर्चा आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रियेला वेग
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य आहे. त्यानुसार नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुका सुरू आहेत. पुढे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका, त्यानंतर महापालिका निवडणुका होण्याची चर्चा होती. मात्र अलीकडे महापालिका निवडणुका आधी आणि जिल्हा परिषद–पंचायतींच्या नंतर असा नवा कालावधी चर्चेत आहे. राज्य निवडणूक आयोगाने सर्व महापालिका आयुक्तांसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतल्यानंतर या अटकळींना आणखी जोर मिळाला आहे.


