प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे हेच जनतेच्या मनातील उमेदवार असल्याचा दावा केला आहे. राज्यात सर्वेक्षण घेतल्यास शिंदे यांनाच सर्वाधिक पसंती मिळेल, असे ते म्हणाले. या वक्तव्यामुळे महायुतीतील नेतृत्वाच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे.
राज्यातील राजकारण पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेने तापलं आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणांबाबत नवी चर्चा सुरू झाली आहे. जनतेच्या मनात आजही मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचंच नाव असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला. सोलापुरात माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले की, “आज राज्यात सर्वेक्षण घेतलं तर मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती एकनाथ शिंदेंनाच मिळेल.” त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. महायुतीत नेतृत्वाबाबत सर्व काही सुरळीत नसल्याचं चित्र या वक्तव्यातून दिसत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शिंदेच महत्व कमी नाही झालं
बच्चू कडू यांनी थेट जनतेच्या भावना व्यक्त करत असल्याचा दावा केला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना घेतलेले निर्णय, केलेली कामं आणि सामान्य कार्यकर्त्यांशी ठेवलेला संपर्क यामुळे त्यांची लोकप्रियता कायम असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आगामी राजकीय समीकरणांमध्ये शिंदेंचं महत्त्व कमी लेखता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत असताना बच्चू कडूंच्या या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. महायुतीतील विविध पक्षांमध्ये भविष्यातील नेतृत्वाबाबत वेगवेगळे मतप्रवाह असल्याचंही यामुळे अधोरेखित झालं आहे.
महायुतीतील नेते काय म्हणतात?
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. एकनाथ शिंदे समर्थकांकडूनही बच्चू कडू यांच्या वक्तव्याचं स्वागत करण्यात येत आहे. तर विरोधकांनी मात्र हे महायुतीतील अंतर्गत अस्वस्थतेचं लक्षण असल्याची टीका केली आहे. बच्चू कडू यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावरून चर्चा रंगू लागली आहे. महायुतीतील नेते या मुद्द्यावर काय भूमिका घेतात आणि आगामी काळात नेतृत्वाबाबत कोणते संकेत मिळतात, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
