Vikata Sankashti Chaturthi Vrat Katha : येत्या ५ एप्रिल, रविवारी विकट संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जाणार आहे. धर्मग्रंथांमध्ये या व्रताचं विशेष महत्त्व सांगितलं आहे. असं मानतात की या व्रताची कथा ऐकल्याशिवाय पूर्ण फळ मिळत नाही.

Vikata Sankashti Chaturthi Vrat Katha : धर्मग्रंथानुसार, वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला 'विकट संकष्टी चतुर्थी' म्हणून ओळखलं जातं. वर्षात येणाऱ्या ४ मुख्य चतुर्थी तिथींपैकी ही एक आहे. यंदा हे व्रत ५ एप्रिल, रविवारी केलं जाईल. या चतुर्थी व्रताचं महत्त्व स्वतः भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितलं होतं. या व्रताशी संबंधित एक कथाही आहे, जी ऐकल्यानंतरच व्रताचं पूर्ण फळ मिळतं, असं म्हणतात. चला तर मग, जाणून घेऊया विकट संकष्टी चतुर्थी व्रताची संपूर्ण कथा…

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

विकट संकष्टी चतुर्थी व्रत कथा

फार पूर्वी रन्तिदेव नावाचे एक पराक्रमी राजे होते. त्यांच्या राज्यात धर्मकेतू नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याला सुशीला आणि चंचला नावाच्या दोन बायका होत्या. सुशीला खूप धार्मिक होती, त्यामुळे ती नेहमी व्रत-वैकल्ये करायची. यामुळे तिचं शरीर खूप अशक्त झालं होतं. तर दुसरीकडे, चंचला कधीच कोणताही उपवास करत नसे.

काही काळानंतर सुशीलाने एका मुलीला आणि चंचलाने एका मुलाला जन्म दिला. हे पाहिल्यावर चंचला सुशीलाला टोमणे मारू लागली, 'तू इतके उपवास केलेस, तरी तुला मुलगी झाली आणि मी काहीही न करता मुलाला जन्म दिला.' हे ऐकून सुशीलाला खूप वाईट वाटायचं.
सुशीलाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन एक दिवस गणपतीने तिला दर्शन दिलं आणि वर दिला, 'तुझ्या मुलीच्या मुखातून मौल्यवान रत्नं पडतील आणि लवकरच तुला एक विद्वान पुत्र होईल.' श्रीगणेशाच्या कृपेने तसंच घडलं. पण काही काळानंतर धर्मकेतूचा मृत्यू झाला.
यानंतर चंचलाने सर्व संपत्तीवर कब्जा केला आणि सुशीलाला घरातून बाहेर काढलं. पण गणेशाच्या कृपेमुळे सुशीला काही काळातच चंचलापेक्षाही श्रीमंत झाली. हे पाहून चंचलाचा तिच्यावर जळफळाट होऊ लागला. एकदा सुशीलाची मुलगी विहिरीवर पाणी भरत असताना, चंचलाने तिला विहिरीत ढकलून दिलं.
पण श्रीगणेशाच्या कृपेने तिचा जीव वाचला. हा चमत्कार पाहून चंचलाचं हृदयपरिवर्तन झालं आणि तिने सुशीलाकडे जाऊन आपल्या चुकीची माफी मागितली. सुशीलाच्या सांगण्यावरून चंचलानेही गणपतीचं व्रत करायला सुरुवात केली. यामुळे दोघींमध्ये पुन्हा प्रेम आणि सलोख्याचं नातं निर्माण झालं.