CJP Leader Saurav Das and Ashutosh Ranka : सोनम वांगचुक यांनी २६ दिवसांनी उपोषण संपवलं. पण दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरूच आहे. याच दरम्यान, CJP चे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका हे मोदी सरकारच्या निमंत्रणावरून चर्चेसाठी पोहोचले आहेत. कोण आहेत हे दोघे?
नवी दिल्ली : दिल्लीतील जंतरमंतरवर नीट पेपरफुटीप्रकरणी आंदोलन सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तब्बल २६ दिवसांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. २० जुलै रोजी तरुण आंदोलकांनी मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर सरकार आणि कॉकरोच जनता पार्टी यांच्यात पहिल्यांदा चर्चा झाली. त्यानंतर केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत आणि मागण्यांवर आश्वासनानंतर त्यांनी सूप पिऊन आपलं आमरण उपोषण संपवलं. पण अजूनही कॉकरोच जनता पार्टीचं जंतरमंतरवरील आंदोलन अजूनही सुरूच आहे.
यानंतर आज शुक्रवारी CJP आणि सरकारमध्ये दुसऱ्यांदा चर्चा झाली. CJP चे मुख्य प्रवक्ते सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका हे मोदी सरकारसोबत केंद्रीय मंत्र्यांसोबतच्या बैठकीसाठी पोहोचले आहेत. अभिजित दीपके कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक आहेत. पण सरकारसोबत झालेल्या बैठकीत उपस्थित असलेले सौरव दास आणि आशुतोष रांका कोण आहेत?
कोण आहे सौरव दास?
सामाजिक कार्यकर्ते असलेले सौरव दास 'कॉकरोच जनता पार्टी'मध्ये येण्यापूर्वी एक पत्रकार होते. ते देशातील कायदेशीर, न्यायालयीन आणि सामाजिक मुद्द्यांवर सखोल रिपोर्टिंग करायचे. नोव्हेंबर २०२५ मध्ये दिल्लीच्या इंडिया गेटवर झालेल्या मोठ्या प्रदूषणविरोधी आंदोलनाचं नेतृत्व त्यांनीच केलं होतं. सौरव दास तेव्हा पहिल्यांदा चर्चेत आले, जेव्हा त्यांनी कोरोना काळात माहितीच्या अधिकाराचा वापर करून आणि न्यायालयीन लढाईतून 'आरोग्य सेतू ॲप'च्या निर्मिती आणि कार्यप्रणालीबद्दल महत्त्वाची माहिती समोर आणली होती. यानंतर ते राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झाले. सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स असून, आज ते करोडो तरुणांचा आवाज बनले आहेत.
कोण आहेत आशुतोष रांका?
सौरव दास यांच्याप्रमाणेच आशुतोष रांका हे सुद्धा 'कॉकरोच जनता पार्टी'चे प्रवक्ते आहेत. ते व्यवसायाने कन्सल्टंट, पब्लिक पॉलिसी एक्सपर्ट आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. शिक्षणाबद्दल बोलायचं झाल्यास, त्यांनी कानपूर आयआयटीमधून (IIT) बी.टेकची पदवी घेतली आहे. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते लंडनला गेले, जिथे त्यांनी प्रसिद्ध लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स केलं. त्यांनी 'मॅकिन्से अँड कंपनी' या मॅनेजमेंट कन्सल्टिंग फर्ममध्ये कामही केलं आहे. पण, देशातील तरुणांच्या हक्कांसाठी त्यांनी नोकरी सोडून लढण्याचा निर्णय घेतला. याआधीही त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक आंदोलनं केली आहेत.

