PoK Will Soon Rejoin India : ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख उमर अहमद इलियासी यांनी एक मोठं विधान केलं आहे. कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये झालेला विकास पाहून पाकव्याप्त काश्मीर (PoK) लवकरच भारतात सामील होईल, म्हणजेच त्याची 'घरवापसी' होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
PoK Will Soon Rejoin India : ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख उमर अहमद इलियासी यांनी पाकव्याप्त काश्मीर (PoK) बद्दल एक मोठं भाकीत केलं आहे. त्यांच्या मते, पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात सामील होईल आणि त्याची 'घरवापसी' होईल. नुकत्याच जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी हे विधान केलं, ज्यामुळे आता एका नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.
पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग
इलियासी म्हणाले की, 'पाकव्याप्त काश्मीरमधील बहुसंख्य लोकांना भारतात यायचं आहे. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये जो विकास होतोय, तो पाहून ते प्रभावित झाले आहेत. तिकडे लोकांचं आयुष्य खूप खडतर आहे. त्यामुळे लवकरच घरवापसी होईल, कारण भारत आता एक मजबूत देश म्हणून पुढे येत आहे.'
पूर्वी काश्मीर खोऱ्यात दगडफेक, आंदोलनं आणि गोळीबाराचे आवाज ऐकू यायचे. पण कलम ३७० हटवल्यापासून इथं शांतता आहे. "आता इथली मुलं शिक्षणावर आणि तरुण करिअरवर लक्ष केंद्रित करत आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये तरुण चांगली कामगिरी करत आहेत. हा बदल खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे," असं इलियासी यांनी सांगितलं.
पहिलगाम हल्ल्याने भारत डगमगणार नाही
जम्मू-काश्मीरमध्ये वेगाने विकास होत असतानाच पहिलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याने देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पण अशा हल्ल्यांनी भारत डगमगणार नाही, असं इलियासी म्हणाले. "जम्मू-काश्मीर आता पूर्वीपेक्षा खूप सुरक्षित आहे. पर्यटक कोणत्याही भीतीशिवाय इथे फिरू शकतात," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यांनी पुढे सांगितलं की, जम्मू-काश्मीरमध्ये आता गुंतवणूक येत आहे, तरुणांना नोकऱ्या मिळत आहेत आणि ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. शैक्षणिक क्षेत्रातही प्रगती होत आहे. पूर्वीचं काश्मीर आणि आताचं काश्मीर यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.


