PM Modi Reaction on NEET Paper Leak : दिल्लीत संसदेबाहेर काल झालेल्या आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीट पेपर लीक प्रकरणी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीकडून काल २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठा गोंधळ झाला. आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. या घटनेनंतर देशभरातच संताप व्यक्त होत आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी नीट पेपरफुटीबाबत पहिल्यांदा आपलं विधान केलं आहे.

दिल्लीतील आंदोलनानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

‘तरुणांच्या भविष्याशी तडजोड केली जाणार नाही, पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा दिली जाईल, सरकारने पेपरफुटीच्या मुद्द्यावर कारवाई केली आहे. नीट पेपर लीक ही घटना राजकारणाचा विषय नाही. पेपरफुटीच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येऊ नये यासाठी फेरपरीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा यशस्वीरित्या झाली, सरकार विद्यार्थ्यांबाबत, त्यांनी व्यक्त केलेल्या चिंतेबाबत संवेदनशील आहे’, असं एनडीएच्या संसदीय बैठकीत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी विधान केलं आहे.

अशा घटना रोखण्यासाठी भविष्यात उपाययोजना करणार - पंतप्रधान मोदी

पुढे बोलताना त्यांनी असंही म्हटलं, की ‘हा केवळ केंद्र सरकारचा विषय नाही तर हा संपूर्ण देशाचा विषय आहे. हा कोणत्याही राजकारणाचा विषय नाही, तर हा देशाचा, देशातील तरुणांचा, त्यांच्या भविष्याचा विषय आहे. त्यामुळे पेपर लीक प्रकरणी जे जबाबदार आहेत, त्यांना शिक्षा व्हावी यासाठी सर्वांनी एकत्र यावं, पुढील काळात, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील’.

जे.पी. नड्डा यांच्याकडे कॉकरोच जनता पार्टीचं लेखी निवेदन

दरम्यान, काल २० जुलै रोजी संसदेवर काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान कॉकरोच जनता पार्टीचे सौरव दास आणि आशुतोष राका यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा झाली. सीजेपीकडून लेखी मागण्याही सरकारकडे निवेदनातून देण्यात आल्या. मात्र या मागण्यांवर कोणतंही उत्तर किंवा आश्वासन सरकारकडून देण्यात आलेलं नाही. यावेळी बोलताना आंदोलकांनी आंदोलन थांबवावं आणि परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाला मदत करावी असं आवाहन केलं होतं.