Atal Bihari Vajpayee Death Anniversary : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि राजनाथ सिंह यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली. 'सुशासन आणि लोककल्याणासाठी समर्पित एक असामान्य राजकारणी' म्हणून त्यांनी वाजपेयींची आठवण काढली.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली. १८ ऑगस्ट २०१८ रोजी वाजपेयी यांचं निधन झालं होतं. मोदींनी त्यांना एक 'असामान्य राजकारणी' म्हणून संबोधलं. ते म्हणाले की, वाजपेयींची दूरदृष्टी, नेतृत्व आणि सुशासन व लोककल्याणासाठीची वचनबद्धता आजही अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहे.
पंतप्रधान मोदींनी X (पूर्वीचं ट्विटर) वर एक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणाले, "अटलजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. ते एक विलक्षण दूरदृष्टी असलेले असामान्य नेते होते, ज्यांनी आपलं जीवन राष्ट्रसेवेसाठी समर्पित केलं." मोदी पुढे म्हणाले, "त्यांचे शब्द आणि कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देतात आणि त्यांच्या नेतृत्वाने आपला देश मजबूत झाला. सुशासन आणि लोककल्याणावर त्यांनी दिलेला भर आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत राहील."
अमित शाह यांनी मूल्य-आधारित राजकारणाची आठवण काढली
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही वाजपेयींना आदरांजली वाहिली. त्यांनी वाजपेयींना एक देशभक्त आणि आपलं आयुष्य राष्ट्रसेवेसाठी वाहून देणारे राजकारणी म्हटलं आहे. शाह यांनी X वरील पोस्टमध्ये लिहिलं, "माजी पंतप्रधान आणि भाजपचे संस्थापक, भारतरत्न आदरणीय अटलबिहारी वाजपेयीजींच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो."
ते म्हणाले, "अटलजी असे देशभक्त राजकारणी होते, ज्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण राष्ट्रसेवेसाठी समर्पित केला. एकीकडे त्यांनी अणुचाचणी आणि कारगिल युद्धाद्वारे भारताची ताकद जगाला दाखवून दिली, तर दुसरीकडे त्यांच्या मूल्य-आधारित राजकारणामुळे अंत्योदय आणि सुशासनाची संकल्पना पहिल्यांदाच प्रत्यक्षात आली." शाह पुढे म्हणाले, "अटलजींचं व्यक्तिमत्व आणि नेतृत्व भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला राष्ट्र उभारणीसाठी नेहमीच प्रेरणा देत राहील."
राजनाथ सिंहांना आठवला 'राष्ट्र प्रथम'चा नारा
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही वाजपेयींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. त्यांनी भारतीय लोकशाही आणि राष्ट्रीय विकासातील त्यांच्या योगदानाची आठवण काढली. X वरील पोस्टमध्ये सिंह म्हणाले, "आदरणीय अटलबिहारी वाजपेयीजींच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना कोटी कोटी नमन आणि विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो."
ते म्हणाले, "अटलजींनी आपल्या विचारांनी आणि कृतींनी भारतीय लोकशाहीला समृद्ध केलं. त्यांनी आयुष्यभर 'राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम' (Nation First, Always First) या भावनेने काम केलं. त्यांच्यासाठी राजकारणाचा मूळ उद्देश राष्ट्रहित आणि लोकसेवा हाच होता." सिंह पुढे म्हणाले, "अटलजींच्या नेतृत्वाखाली भारताने सामरिक सामर्थ्य, आर्थिक विकास आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात नवी उंची गाठली. देशात आत्मविश्वास निर्माण करण्यात आणि विकासाला नवी दिशा देण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती."
त्यांनी पुढे सांगितलं, "त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचे आदर्श आणि राष्ट्रसेवेचा त्यांचा संकल्प आम्हा सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील."
वाजपेयींची राजकीय कारकीर्द
अटलबिहारी वाजपेयी यांनी तीन वेळा पंतप्रधानपद भूषवलं. १९९६ मध्ये त्यांचं सरकार फक्त १३ दिवस टिकलं. त्यानंतर १९९८ ते १९९९ या काळात ते ११ महिने पंतप्रधान होते. पुढे १९९९ ते २००४ या काळात त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. २०१५ मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' प्रदान करण्यात आला.

