राजस्थानमधील एका व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानच्या ISI साठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. १५ वर्षांपूर्वी नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानला गेलेला हा व्यक्ती, नंतर ISI च्या जाळ्यात ओढला गेला.

दिल्ली: भारतातील सुरक्षेविरोधात काम करणाऱ्या पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी (ISI) माहिती पुरवणाऱ्या एका संशयित हेराला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. हसीन नावाचा आरोपी, राजस्थानच्या डीग जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्याचा प्रवास एका साध्या नातेवाईकांना भेटण्याच्या हेतूपासून सुरू होऊन थेट देशद्रोहापर्यंत पोहोचला.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

१५ वर्षांपूर्वी गेला पाकिस्तानला, आता गद्दार म्हणून अटक

हसीन १५ वर्षांपूर्वी आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानला गेला होता. मात्र, तिथे झालेल्या संपर्कांमधून तो हळूहळू ISI च्या सापळ्यात अडकत गेला. त्याने पाकिस्तानसाठी हेरगिरीचे काम स्वीकारले, असा पोलिसांचा दावा आहे. विशेष म्हणजे, हसीनचा भाऊ कासिम यालाही यापूर्वी अटक झाली होती आणि त्याच्याच चौकशीतून हसीनचं नाव पुढे आलं.

सिम कार्ड आणि OTP द्वारे हेरगिरीचं जाळं

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हसीनने भारतातून सिम कार्ड पाकिस्तानला पाठवली, त्यावर व्हॉट्सअॅप अकाउंट सुरू करण्यासाठी आवश्यक OTP देण्यात मदत केली. ही सिम कार्ड वापरून देशांतर्गत संवाद, संवेदनशील ठिकाणांची माहिती आणि लष्करी परिसरांचे फोटो पाक एजंटपर्यंत पोहोचवले जात होते.

थोड्याशा पैशांसाठी देशाशी गद्दारी!

हसीनने या कारवायांसाठी काही रक्कम मिळवली होती. त्याने फक्त स्वतःच नाही, तर कुटुंबातील इतर सदस्यांनाही पाकिस्तानचा व्हिसा मिळवून देण्याचा प्रयत्न केला, हे उघड झाले आहे. त्यामुळे ही एकटी व्यक्ती नसून, एक मोठं नेटवर्क तयार झालं असल्याचं स्पष्ट होत आहे.

पोलीस कोठडी आणि सखोल चौकशी सुरू

हसीनला न्यायालयात हजर केल्यानंतर, त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता तपास यंत्रणांचं लक्ष हसीनने किती आणि कोणती माहिती पाकिस्तानला दिली, आणि या नेटवर्कमध्ये आणखी कोण कोण सामील आहे, यावर केंद्रित आहे.

एका सामान्य वाटणाऱ्या प्रवासातून उगम पावलेली देशाशी गद्दारीची कहाणी केवळ धक्कादायकच नव्हे, तर इशारा देणारीही आहे. अशा हेरगिरीच्या घटना थांबवण्यासाठी सतर्क नागरिकत्व आणि प्रभावी गुप्तचर यंत्रणा ही काळाची गरज आहे.